जयपूर येथे चिंतन शिबीराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे काँग्रेस संबोधात्मक भाषण झाले. जागतिक मंदीला आळा घालण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पक्ष या नात्याने आम्ही अंतर्मुख होऊन विचार केला त्यामुळे इतर देश मंदीत होरपळत असताना मंदीचा भारतावर तितकासा प्रभाव झालेला नाही. असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा मुख्य असेल आणि काँग्रेसने हा विकास साधला आहे त्यामुळे २०१४ च्या निवडणुकांत देशातील जनता काँग्रेसलाच सत्तेत आणेल असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. सोनिया गांधी म्हणाल्या की ,”काँग्रेस देशातील प्रमुख पक्ष असल्याने नागरीकांच्या अपेक्षाही जास्त आहेत. त्यासाठी सरकारने पाच कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. नागरीकांचा आमच्यावर असलेल्या विश्वसाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षेचा अधिकार आहे. महिलांच्या उद्धारासाठी अनेक योजना तसेच महिला बचत गटांसाठीही योजना आम्ही सुरु करणार आहोत” त्याचबरोबर महिलां विरोधातल्या टिपण्णी खपवून घेतल्या जाणार नाहीत. प्रत्येक महिलेला सुरक्षेचा अधिकार आहे,त्यामुळे महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून घेण्यात लक्ष घालणार असल्याचेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या की ,” अन्याय झालेल्या महिलांचे ती तरूणी प्रतिक आहे. भारताच्या एकात्मतेला आम्ही तडा जाऊ देणार नाही.” काँग्रेससारखी वैचारिक बैठक इतर कोणत्याही पक्षात नाही आणि ‘आपका पैसा आपके हाथ’ या योजनेव्दारे भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress will win the loksabha electionsoniya gandhi
First published on: 20-01-2013 at 01:39 IST