राजस्थानची राजधानी जयपुरमधील एका महाविद्यालयात नमाज पठण करण्यात आल्याने वादंग निर्माण झाला असून, वातावरण तापलं आहे. राजस्थान महाविद्यालयात शुक्रवार १२ नोव्हेंबर रोजी महाविद्यलयीन परिसरात काही विद्यार्थ्यांनी नमाज पठण केले होते. यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसरात नमाज पठण करण्यापासून थांबले होते.

तर, एनएसयूआयचे काही विद्यार्थ्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की त्यांना मैदानात नमाज पठण करू दिले जावे, अन्यथा स्वतंत्र जागा दिली जावी. या मागणीमुळे महाविद्यालयातील वातावरण तापल्याचं दिसत आहे.

नमाज पठण करू देण्यासाठी एकीकडे मागणी होत असताना, दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यास विरोध दर्शवत महाविद्यालयात हनुमान चालिसाचे पठण केले. अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन परिसरात हनुमान चालिसा पठण करत असल्याच व्हिडिओ देखील समोर आला आहे.

तर एनएसयूआयचे म्हणणे आहे की, नमाज पठण करण्यापासून थांबवणारे शिक्षक आणि सुरक्षा रक्षक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी यांनी म्हटले की, इथे प्रत्येक धर्माचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. पण आरएसएसशी संबंधित असलेल्या शिक्षकाने विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांनाच त्रास दिला. हे मान्य नाही. त्यांनी म्हटले की आम्ही तोपर्यंत विरोध करत राहू जोपर्यंत धार्मिक सलोखा बिघडवणारा शिक्षक व सुरक्षा रक्षकास कामावरून काढलं जात नाही.

दुसरीकडे अभाविपकडून महाविद्यालय परिसरात नमाज पठणास तीव्र विरोध दर्शवला जात आहे. अभाविपचे प्रदेशमंत्री हुशियार मीना यांनी सांगितले की, महाविद्यालयीन परिसरात काही समाजकंटकांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अशांवर कायदेशीर कारवाई केली गेली नाही तर अभाविप संपूर्ण राज्यात आंदोलन करेन.

याशिवाय मुस्लीम परिषदचे अध्यक्ष युनूस चोबदार यांनी देखील आरोप केली आहे की, वातावर खराब करण्यासाठीच शिक्षक व सुरक्षारक्षकाने नमाज पठण थांबवले. महाविद्यालयीन प्रशासानाने या दोघांवर कारवाई केली पाहिजे.