भारतात करोनाबाधित रुग्णसंख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. मात्र तरीही करोना महासाथीचं शिखर गाठण्यापासून भारत दूर असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) निवेदिता गुप्ता यांनी दिली आहे. देशात गेल्या २४ तासांत ८,१७१ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख, ९८ हजार ७०६ इतकी झाल्याचे मंगळवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत विविध राज्यांनी नोंद केलेल्या रुग्णांची संख्या एकत्रित केली असता देशातील रुग्णसंख्या २,००,३२१ वर पोहोचली. तसेच देशभरातील मृतांची एकूण संख्या ५,७३९ नोंदविण्यात आली.

निवेदिता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. भारतात करोनाच्या महासाथीने अजून तरी शिखर गाठलेले नाही. देशभरात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आलं आहे”.

देशात समूह संसर्ग झाला असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने समूह संसर्ग हा शब्दप्रयोग करणे टाळलं आहे. केंद्र सरकारनेही समूह संसर्ग झाल्याचे नाकारलं आहे. समूह संसर्ग हा शब्द वापरण्यापेक्षा करोनाचा प्रादुर्भाव किती झाला आहे हे पाहणं अधिक गरजेचं आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरलेले आहेत. मृत्यूदर कमी करण्यातही भारताला यश आलं आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

देशातील करोना रुग्णांची संख्या मंगळवारी दोन लाखांवर पोहोचली. त्यातील जवळपास एक लाख रुग्णांची नोंद गेल्या १५ दिवसांत झाली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के असून, इतर देशांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

देशात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २.८२ टक्के असून जगभरातील सरासरीपेक्षा हे प्रमाण खूप कमी आहे. करोनाबाधितांमध्ये ७३ टक्के मृत्यूंमध्ये रुग्णांना अन्य गंभीर आजार असल्याचे आढळून आले आहे. देशात वयोवृद्धांची संख्या १० टक्के असून करोनामुळे झालेल्या प्रत्येक दोन मृत्यूंमध्ये एक वयोवृद्ध आहे, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.

आतापर्यंत देशभरात ९५,५२७ करोना रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.०७ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच एकूण रुग्णांपैकी निम्मे बरे होत आहेत. हे प्रमाण १८ मे रोजी ३८.२९ टक्के, ३ मे रोजी २६.५९ टक्के तर १५ एप्रिल रोजी ११.४२ टक्के होते, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली.