पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर देशात निर्माण झालेली स्थिती आणि भविष्यात घ्यावे लागणारे निर्णय यावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यासोबत नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीने चर्चा करण्याची ही चौथी वेळ होती. यावेळी नरेंद्र मोदींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते जाणून घेऊयात १) करोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते तिथे आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. तसंच कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. २) योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. ३) पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे. ४) आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारांटाईन करायचे आहे. ५) लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. ६) करोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “ दो गज दूरी” हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. ७) लॉकडाउनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा. ८) एका बाजूला आपल्याला करोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे. ९) ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १०) संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा. ११) पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी १२) मोठ्या शहरांमध्ये रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा. १३) सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत १४) येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज आहे. असे झोन्स फुल प्रुफ करा. १५) ज्या राज्यांमध्ये करोनाचा आकडा वाढतोय ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका १६) करोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात दुर्लक्ष नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच. १७) ज्या क्षेत्रांमध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली. पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत त्याचा अभ्यास करा. १८) रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे. १९) हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल. २०) प्रत्येक राज्याने जे बदल होत आहे त्यावर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.