क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका व वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना रंगणार असला तरी दोन्हीही संघ स्पर्धेबाहेर गेल्यात जमा आहेत. तसेच या सामन्यातील निकालाचा उपांत्य फेरीमध्ये कुठले संघ जातील व कुठले जाणार नाहीत यावर काहीच परिणाम पडणार नसल्यामुळे आजचा सामना हा केवळ उपचार असून; असून नसल्यासारखाच आहे.
श्रीलंका सात सामन्यांमध्ये सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे तर वेस्ट इंडिज सात सामन्यांमध्ये तीन गुणांसह नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेने आजच्यासह उर्वरीत दोन्ही सामने जिंकले तरी त्यांच्या गुणांची बेरीज दहा होते व उपांत्या फेरीत जाण्यासाठी किमान अकरा गुण आवश्यक असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही संघ उपांत्य फेरीत जाणं जवळपास अशक्य आहे.
ऑस्ट्रेलियानं १४ गुणांसह उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलेलं आहे. भारत व न्यूझीलंड अनुक्रमे सात व आठ सामन्यांमध्ये प्रत्येकी ११ गुण मिळवून उपांत्य फेरीच्या दरवाजावर आहेत. इंग्लंड आठ सामन्यांत १० गुण, पाकिस्तान आठ सामन्यांत नऊ गुण व बांगलादेश सात सामन्यांमध्ये सात गुणांवर असून या तीन संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस आहे.
उद्या मंगळवारी भारत बांगलादेश या संघात सामना होणार असून हा सामना भारत जिंकल्यास बांगलादेश बाद होईल तर भारत उपांत्य फेरीत निश्चित प्रवेश करेल. परंतु हा सामना बांगलादेश जिंकल्यास पाच जुलैचा पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश या सामन्याला कमालीचं महत्त्व प्राप्त होईल. कारण या सामन्यात हरणारा संघ निश्चितपणे स्पर्धेबाहेर जाईल तर जिंकणाऱ्या संघाचं भवितव्य अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून असेल. तसेच भारताला शेवटी होणार सहा जुलैचा श्रीलंकेविरुद्धचा सामना जांकिवाच लागेल.
तीन जुलै रोजी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार असून हा सामना जो जिंकेल त्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. आणि हा सामना जो हरेल त्याचा प्रवेश जर तरच्या गणितांवर अवलंबून असेल. त्यामुळे उद्यापासूनचे सामने उपांत्य फेरीतील प्रवेशाची गणितं घडवणारी बिघडवणारी असली तरी आजचा श्रीलंका वेस्ट इंडिजमधला सामना मात्र सपक असेल अशीच शक्यता आहे.