भारताच्या धर्मनिरपेक्ष नीतीच्या परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याचे तरुण पिढीला स्मरण करून द्यावे, असे आवाहन तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी सर्व धर्मातील धर्मगुरूंना केले आहे.आधुनिक भारत काहीसा भौतिकतावादी झाला असून तरुण पिढी धार्मिकतेऐवजी सध्या पैशांची भाषाच करीत आहे. मात्र भौतिकतावादी विकासाने केवळ शारीरिक सुसह्य़ता होते, मानसिक नाही याची जाणीव धर्मगुरूंनी तरुण वर्गाला करून द्यावी, असे आवाहन दलाई लामा यांनी शांतता आणि जातीय सलोख्यावर आधारित एका परिषदेला संबोधित करताना केले.मीपणाचा सध्या अतिरेक झाला असून त्यामुळे पिळवणूक, फसवणूक होते. त्यामुळे इतरांकडे लक्ष देणे हे आपल्या हिताचे आहे. मानवी मूल्ये आणि धर्मनिरपेक्ष नीतीला शिक्षणाद्वारे अधिष्ठान देऊन आपल्याला जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी अधिक काम करावे लागेल, असेही लामा म्हणाले.शाळेत आरोग्याबाबतचे शिक्षण दिले जाते, मात्र ते अपुरे असून शारीरिक आणि भावनिक आरोग्याबाबतचे शिक्षण देणे गरजेचे आहे. भारतासाठी धर्मनिरपेक्ष संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे, भारताची घटनाच धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे, असेही ते म्हणाले.‘तर दलाई लामा ही व्यवस्थाच नसेल’दलाई लामा या पदाची आणि व्यवस्थेची गरज आहे काय याचा निर्णय तिबेटी जनता घेतील, असे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी सांगितले. दलाई लामा या पदावर महिलेस विराजमान करावे की नाही, याचा निर्णयही तिबेटी जनताच घेईल, असेही ते म्हणाले.‘‘माझ्या मृत्यूनंतर पुढील दलाई लामा कोण असेल, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मात्र या परंपरेची आणि व्यवस्थेची आता गरज आहे काय, हे तिबेटी जनतेने ठरवायचे आहे. त्यांना या पदाची गरज वाटत नसेल, तर आगामी दलाई लामा नसेल,’’ असे दलाई लामा यांनी सांगितले. गुवाहाटी येथे आयोजित केलेल्या शांती आणि धर्म सद्भावना संमेलनात ते बोलत होते. बहुसंख्य तिबेटी जनता काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर जनतेला ही व्यवस्थाच नको असेल, तर दलाई लामा हे पद दूर केले जाईल, असे लामा म्हणाले. आगामी दलाई लामा महिला असेल काय, असा प्रश्न विचारला असता, का नाही, असे उत्तर त्यांनी दिले.