Rajnath Singh on Operation Sindoor: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये राबविलेले ऑपरेशन सिंदूर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भारतीय सैन्यदलाचे कौतुक केले. “भारतीय लष्कराने अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलता दाखवून कारवाई केली. जे लक्ष्य ठरविले गेले होते. त्यावर अचूक हल्ला करत, दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला”, असे राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी हनुमानाचे उदाहरण देत लष्करी कारवाईचे कौतुक केले.

काय म्हणाले राजनाथ सिंह?

राजनाथ सिंह म्हणाले, “कोणत्याही सामान्य नागरिकाला धक्का लागू नये याची काळजी भारतीय लष्कराने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कराने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.” यावेळी राजनाथ सिंह यांनी हनुमानाचीही आठवण काढली.

“आम्ही हनुमानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचे पालन केले. त्यांनी ज्याप्रकारे अशोक वाटिका उध्वस्त केली होती त्याप्रमाणेच ज्यांनी आम्हाला मारले, त्यांनाच आम्ही मारले”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तसेच या कारवाईत फक्त दहशतवादी मारले गेले असल्याचेही ते म्हणाले.

हल्ल्याचा प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, आपल्या भूमीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे. आम्ही केलेली कारवाई अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. दहशतवाद्यांचे खच्चीकरण करण्यासाठी सदर कारवाई केवळ त्यांच्या इमारती आणि ठिकाणांना लक्ष्य करण्यापर्यंत मर्यादीत ठेवली गेली. मी आपल्या सैन्याच्या शौर्याला सलाम करतो.

बुधवारी पहाटे १.०५ ते १.३० च्या दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ही कारवाई केली”, असे ऑपरेशन सिंदूरनंतर १० तासांनी घेतलेल्या मीडिया ब्रिफिंगमध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या.