काश्मीरमधील इंटरनेट सेवा गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेला बसण्याची इच्छा असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत.

अर्ज भरण्यासाठी सरकारने १० जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रत्येकी एकच इंटरनेट केंद्र सुरू केले असले तरी ही संख्या अपुरी  असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी काश्मीरमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते,  या वेळी विद्यार्थ्यांची संख्या त्याहूनही अधिक आहे.

शाइस्ता बेग ही विद्यार्थिनी अनंतनाग जिल्ह्य़ातून शनिवारी पहाटे निघाली होती, मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत तिला केंद्रावर अर्ज भरता आला नाही, जवळपास १० तास रांगेत असल्याचे तीने सांगितले. चार वाजेपर्यंत केवळ ७३ जणांनाच आपले अर्ज भरता आले होते.

या बाबत श्रीनगरचे उपायुक्त शाहीद इक्बाल चौधरी यांच्याशी ‘द संडे एक्स्प्रेस’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.