बिहारमधील संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप (BJP) युती सरकारची महत्त्वकांक्षी योजना 'हर घर नल का जल'बाबत मोठा खुलासा झालाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ५ वर्षांपूर्वी प्रत्येक घरात पाणी पोहचवणार असल्याचं सांगत ही योजना जाहीर केली. या योजनेच्या घोषित १.०८ लाख पंचायत वार्डात नळपुरवठ्याच्या ध्येयापैकी जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाल्यानं ही योजना यशस्वी मानली गेली. मात्र, या योजनेचे कंत्राटं बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांनाच मिळाल्याचं समोर आलंय. इंडियन एक्स्प्रेसच्या मागील ४ महिन्यांच्या शोधपत्रकारितेत याबाबत अनेक तथ्य समोर आलेत. यामुळे नितीश कुमार यांच्या 'गुड गव्हर्नन्स'च्या प्रतिमेलाही तडा जाताना दिसतोय (Exclusive information about Bihar tap water scheme and conflict of interest). बिहारमधील नळ कनेक्शन देणाऱ्या या योजनेची जमिनीवरील अंमलबजावणीतील राजकीय हस्तक्षेपानं जवळपास ५३ कोटी रुपयांचे कंत्राटं उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांचे नातेवाईक आणि राजकीय समर्थकांना मिळालेत. इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारिते अंतर्गत जवळपास २० जिल्ह्यांमधील या योजनेचे सरकारी कागदपत्रं तपासण्यात आलीत. यात रेजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) आणि पब्लिक हेल्थ इंजिनियरिंग डिपार्टमेंटकडील (PHED) कागदपत्रांचाही समावेश आहे. या अंतर्गत हर घर नल का जल योजनेचं काम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी देखील भेटी देण्यात आल्यात. यात ठेकेदार, कामगार आणि पाणी नळाचा लाभ मिळालेल्या नागरिकांशीही संवाद साधण्यात आला. ३५ प्रकल्पांची कामं उपमुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांना सरकारी कागदपत्रांच्या अभ्यासानुसार २०१९-२० मध्ये पीएचईडीने पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी ३५ प्रकल्प राबवले. यात काटीहार जिल्ह्यातील ९ पंचायतींचा समावेश झाला. या ३५ प्रकल्पांची कामं उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांची सून पूजा कुमारी आणि मेव्हुणा प्रदीप कुमार भगत यांच्या दोन कंपन्यांना मिळालीत. याशिवाय प्रसाद यांचे सहकारी प्रशांत चंद्र जैस्वाल, ललित किशोर प्रसाद आणि संतोष कुमार यांनाही या कामाचे काही कंत्राटं मिळाले आहेत. काटीहार जिल्ह्यातील याच मतदारसंघातून उपमुख्यमंत्री प्रसाद मागील ४ वेळा आमदार म्हणून निवडून येत आहेत. कामाचा अनुभव नसताना कंत्राटं दिल्याचा आरोप काही ठेक्यांमध्ये तर तारकिशोर प्रसाद यांच्या कुटुंबातील सदस्यांना थेट कंत्राटं मिळाल्याचंही उघड झालंय. कागदपत्रांनुसार काटीहार जिल्ह्यातील भावडा पंचायतीच्या सर्व १३ वार्डातील कामं पूजा कुमारी आणि प्रदीप कुमार यांच्या कंपन्यांना मिळालेत. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनीही नाव उघड न करण्याच्या अटीवर पूजा कुमारी यांना या कामाचा आधीचा कोणताही अनुभव नसल्याचं सांगितलंय. तारकिशोर प्रसाद यांच्याकडून आरोपांचं खंडन इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेतील निष्कर्षांनंतर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच योजनेचे कंत्राटं देण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नसल्याचा दावा केलाय. असं असलं तरी स्वतः प्रसाद यांनीच आपल्या सूनेला ४ वार्डातील कामाचे कंत्राटं मिळाल्याचं मान्य केलंय. मात्र, इतर दोन कंपन्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या दोनपैकी एका कंपनीत त्यांचा मेव्हुणा संचालक मंडळावर आहे. प्रसाद यांची सून पूजा कुमारी यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर देणं टाळलं आहे. त्यांचे पती आणि उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र अमित कुमार यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं. Exclusive information about Bihar tap water scheme and conflict of interest