Malegaon Blast case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रसाद पुरोहितने एनआयए कोर्टात खळबळजनक माहिती दिली आहे. दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी आपल्यावर दबाव होता, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करण्यासाठी दबाव टाकला गेला असा दावा प्रसाद पुरोहितने केला आहे.

खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा

मुंबईतल्या सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पुरोहितचा लेखी जबाब सादर करण्यात आला. हा जबाब २३ पानांचा आहे. आपल्यावर राजकीय दबाव असल्याने एटीएसने खोटी केस दाखल केली असा आरोप पुरोहित यांनी आपल्या लेखी जबाबात केला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्टवादी नेता डॉ. गणपती या दोघांची एक भेट झाली होती. या भेटीची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील नक्षली कारवायांची माहिती भारतीय लष्कराला दिली होती असंही या लेखी जबाबात पुरोहितने म्हटलं आहे.

हे पण वाचा- “बॉम्बस्फोट घडवणं तुमचं अधिकृत काम नव्हतं”, कर्नल पुरोहितला सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

आरोपी प्रसाद पुरोहितने कलम ३१३ च्या अंतर्गत निवेदन सादर केलं आहे. विशेष न्यायालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचा अधिकार आरोपीला आहे. पुरोहितने म्हटलं आहे की हेमंत करकरे, सिंग आणि तपास अधिकारी मोहन कुलकर्णी यांच्या आदेशाचं पालन इतर सर्व पोलिसांनी केलं. हेमंत करकरे हे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचंही नाव यामध्ये पुरोहितने घेतलं आहे.

झकीर नाईकचं कनेक्शनही सांगितलं

२००६-२००७ मध्ये डॉ. झकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून बनावट नोटा वितरित करण्यात येत होत्या आणि आयएसआयकडून दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिलं जात असल्याचा अहवाल दिला होता असा दावाही पुरोहितने केला आहे.

मालेगावच्या २००८ मधल्या बॉम्बस्फोट प्रकरणातत आरोपी सुधाकर द्विवेदीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टानं नुकतंच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगावर बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात गैरहजर होत्या. त्यामुळे NIA न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना वॉरंट बजावलं आहे.

हे पण वाचा- संजय राऊत यांचा दावा, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरु होता, म्हणूनच..”

मालेगाव स्फोट प्रकरण नेमकं आहे तरी काय?

२००८ मध्ये, रमजान ईद काही तासांवर येऊन ठेपल्याने नवे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लीम आबालवृद्धांची लगबग सुरू असताना २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती.

बॉम्बस्फोट होण्याच्या दोन वर्षांआधी २००६ मध्ये शहरातील बडा कब्रस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला. तर ३०० हून जास्त रहिवासी जखमी झाले होते. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात दोन बॉम्बस्फोट आणि ३८ बळी गेले. तरीही तपासाचा वेग मंदावलेला का? यावरुन खळबळ उडाली होती. या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. घटनास्थळी तातडीने गेलेले मालेगावचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता. त्या वेळी अंगरक्षक आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून हवेत गोळीबार केल्याने प्रभू हे बालंबाल बचावले होते.

कर्नल प्रसाद पुरोहितचं कनेक्शन काय?

कर्नल प्रसाद पुरोहितवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि त्यासाठी २००३-०४ मधलं RDX वापरल्याचा आरोप आहे. कर्नल प्रसाद पुरोहितचा संबंध अभिनव भारत नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेशी आहे असंही बोललं गेलं. तसंच पुरोहितने कथित हिंदू राष्ट्र या संकल्पनेसाठी वेगळा ध्वज, वेगळं संविधान तयार केलं असाही दावा काहींनी केला आहे. मुस्लिम समाजाने जो अत्याचार केला त्याच्या विरोधात उत्तर देण्यासाठी कर्नल पुरोहितने स्फोटकं जमवली असाही आरोप त्याच्यावर आहे.