उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेदरम्यान, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास १५ ते २० शेजारी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. एवढच नाहीतर या संपूर्ण प्रकारानंतर झालेल्या गोंधळात तीन वाहनं जाळण्यात आल्याचंही वृत्त आहे.

या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. काँग्रेस पाठोपाठ आता अन्य विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर या घटनेवरून जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी देखील या घटेनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडलं; दोघांचा मृत्यू

”आमच्या शेतकऱ्यांचा आवज दाबण्याची क्रूर पद्धत. मी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. असं शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. तसेच, #लखीमपुर खीरी नरसंहार असा हॅशटॅग देखील त्यांनी ट्विटसोबत जोडलेला आहे.

दुसरीकडे भारतीय किसान युनियनने दावा केला आहे की, या हिंसाचारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी राकेश टिकैत यांनी म्हटलं की, शेतकरी परतत असताना वाहनांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.

“मोदीजी, तुम्हाला वेदना कधी जाणवतील?”, लखीमपूर प्रकरणानंतर विरोधकांनी भाजपाला घेरलं

तर, काँग्रेसने देखील भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपा शेतकरी चळवळीला, आंदोलनाला थांबवू शकला नाही. म्हणूनच, त्यांनी शेतकऱ्यांशी हे कृत्य केलं. आज या हत्याकांडावर जो कोणी गप्प राहिला आहे त्याने विसरू नये की कालचक्र एक दिवस त्यांनाही लक्ष्य करेल. ही परिस्थितीला सर्वस्वी नरेंद्र मोदींचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी जबाबदार आहेत”, अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केली. श्रीनिवास यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.