Gaurav Taneja Speaks on Ahmedabad Plane Crash: दोन आठवड्यांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २७५ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात विमानातील २४२ प्रवाशांचा समावेश होता. एअर इंडियाचं AI 171 हे बोईंग ७८७ श्रेणीतील विमान अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ केल्यानंतर काही क्षणांत एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. एकीकडे विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या विमान दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात असताना दुसरीकडे १० वर्ष वैमानिक म्हणून काम केलेले गौरव तनेजा यांनी हा अपघात व एकूणच विमान कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत याबाबत गंभीर दावा केला आहे.

गौरव तनेजा यांना सोशल मीडियावर ‘फ्लाईंग बीस्ट’ असंही म्हटलं जातं. यूट्यूबवर त्यांचे १ कोटी सबस्क्रायबर्स असून वेगवेगळ्या विषयांवर ते व्लॉग करत असतात. याशिवाय, विमान उड्डाणांसंदर्भातदेखील ते व्हिडीओ शेअर करत असतात. १० वर्षं त्यांनी कमर्शियल पायलट म्हणून काम केलं आहे. नुकतेच शार्क टँक कार्यक्रमात आपल्या प्रोटीन व्यवसायाची उत्पादनं सादर करण्यासाठी ते झळकले होते. आपल्या विमान उड्डाणांच्या अनुभवावर गौरव तनेजांनी हवाई उड्डाण क्षेत्राविषयी भूमिका मांडली आहे.

एअर इंडिया अपघाताबाबत काय आहेत गौरव तनेजा यांचे दावे?

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेसंदर्भात गौरव तनेजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आणि सोशल मीडियावर अनेक महत्त्वाचे दावे केले आहेत. दोन्ही इंजिन बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा तनेजा यांनी केला आहे. ‘प्रखर के प्रवचन’ या पॉडकास्टमध्ये गौरव तनेजा यांनी एअर इंडियाच्या वैमानिकांवर मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याचा दावा केला आहे. तसेच, ग्राऊंड स्टाफवरदेखील वेळ पाळण्यासंदर्भात मोठा दबाव असल्यामुळे त्यांच्याकडून अनेकदा विमानातील त्रुटींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

“वेळापत्रक ही मोठी समस्या”

वैमानिकांच्या उड्डाणाचं वेळापत्रक ही मोठी समस्या असल्याचं गौरव तनेजा यांनी म्हटलं आहे. “एखाद्याने जर रात्रभर उड्डाण केलं असेल आणि त्याला पुरेसा आराम मिळाला नसेल, तर त्याला दुसरं उड्डाण लगेच करायला सांगितलं जाऊ नये. यासंदर्भात जेव्हा कधी चौकशी होईल, तेव्हा सगळं काही समोर येईल. विमान कंपनीमधली कामाची पद्धत आणि वैमानिकांचं वेळापत्रक लावताना ते नियम पाळतात की नाही हेही उघड होईल”, असं गौरव तनेजा म्हणाले.

“सर साफ कर देता हूँ, प्लेन ले जाओ”

दरम्यान, या पॉडकास्टमध्ये गौरव तनेजांनी त्यांना आलेला एक वैयक्तिक अनुभवदेखील सांगितला आहे. “एकदा मला विमानाच्या एका पंखावर रक्ताचे डाग दिसले. मी ग्राऊंड इंजिनिअरला ही बाब सांगितली. मला वाटलं एखादा पक्षी धडकला असावा. पण ग्राऊंड स्टाफ मला म्हणाला ‘सर साफ कर देता हूँ, ले जाओ’. मी म्हटलं ‘क्या बात कर रहा है?’ अशावेळी काहीही घडू शकतं. फ्लॅपचं किंवा इंजिनचं नुकसान झालेलं असू शकतं. पण एका मर्यादेनंतर मी हे सगळं करणं बंद केलं”, असं गौरव तनेजांनी हताशपणे सांगितलं.

एअर इंडियाकडून इतक्या फ्लाईट रद्द का केल्या?

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द करण्यात आली. याबाबत बोलताना गौरव तनेजा म्हणाले, “मला माहिती आहे की एअर इंडियाचे वैमानिक संतप्त आणि अस्वस्थ आहेत. त्यांना हे माहिती आहे की शेवटी तेच उड्डाणावेळी विमानात असणार आहेत. कंपनी व्यवस्थापन खाली जमिनीवर असणार आहे. विमानाची तपासणी करणारे अभियंतेदेखील खालीच असणार आहेत. सगळे खाली जमिनीवर असतील आणि वैमानिक हवेत विमानात असतील. आता वैमानिक म्हणतायत, आम्ही विमानाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड चालवून घेणार नाही. आम्हाला कोणत एकही त्रुटी नसलेलंच विमान उड्डाणासाठी द्या”, असं गौरव तनेजा यांनी नमूद केलं.

विमान उड्डाणाआधी काय घडतं?

दरम्यान, गौरव तनेजा यांनी विमान उड्डाणाआधी कोणती प्रक्रिया पार पाडली जाते, यासंदर्भात माहिती दिली आहे. “उड्डाण क्षेत्रात पडलेला एक प्रघात म्हणजे एखादी छोटी त्रुटी दिसली की अभियंते वैमानिकाला सांगतात की यासंदर्भात तक्रार करू नका. जर वैमानिकानं तक्रार केली, तर त्यासंदर्भातली संपूर्ण प्रक्रिया सविस्तर करावी लागते. यातून उड्डाणासाठी उशीर होतो. त्यामुळे अभियंते विमान उड्डाणासाठी योग्य असल्याचं सांगतात आणि वैमानिकांनी नंतर विमान उतरल्यावर तक्रार करावी अशी विनंती करतात”, असं तनेजा म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अभियंते अनेकदा वैमानिकांना सांगतात की जी काही त्रुटी आहे, ती उड्डाणादरम्यान उद्भवली असं सांगा. किंवा टेकऑफ घेतल्यानंतर काहीतरी बिघाड झाला असं सांगा. पण प्रत्येकाला सत्य काय आहे ते माहिती असतं. वैमानिक आणि अभियंत्यांमध्ये हे नेहमीच चालत असतं. कंपन्यांनी त्यांची कामाची पद्धत बदलायला हवी. एक-दोन मिनिटांसाठी त्यांनी इतक्या मोठ्या त्रुटींकडे दुर्लक्ष करता कामा नये”, असंही गौरव तनेजांनी म्हटलं आहे.