दिवसागणित देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात महाराष्ट्रासह देशातील १० राज्यात करोनाचा विळखा आधिक वाढला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दहा राज्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची वाढती लोकसंख्या पाहून हा निर्णय घेतला आहे. दहा राज्यातील ३८ जिल्ह्यात तातडीची चाचणी आणि आवश्यक ती निगराणी ठेवली जाणार असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामुळे संसर्ग आणि मृत्यू दर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास मोदी सरकारला आहे.

आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत प्रीती सुदान यांनी सांगितले की, ‘लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह १० राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावं. कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचं व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.’ महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या १० राज्यातील ३८ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

२५ मे रोजी भारत करोनारुग्णांच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये पोहोचला आणि आता अवघ्या तेरा दिवसांत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुदैवाने भारतात रुग्णांच्या आकड्याच्या तुलनेत मृत्यूदर खूप कमी आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. दररोज जवळपास दहा हजार करोनाबाधित रूग्ण आढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. दहा राज्यात करोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्यामुळे तिकडे केंद्र सरकारने आपलं जास्त लक्ष दिलं आहे.