नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दक्षिणेतील सुरक्षित मतदारसंघातून ते पुन्हा लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उत्तर प्रदेशातील अमेठीतून लढण्याचा निर्णय काँग्रेसने अजूनही गुलदस्त्यात ठेवला आहे. भाजपने केरळमध्ये एकही जागा जिंकली नसली तरी वायनाडची लढत प्रतिष्ठेची बनवली आहे.

२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी वायनाडमधून ४ लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. पण, यावेळी ‘भाकप’चे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांची पत्नी अॅनी राजा वायनाडमधून मैदानात उतरल्या असून त्यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हेही वायनाडमधून रिंगणात उतरले असून गुरुवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हेही वाचा >>>अजित पवार गटाला सज्जड ताकीद! चिन्हाबाबत निर्देश तंतोतंत पाळा – सर्वोच्च न्यायालय

वायनाडमध्ये भाजपची ताकद नगण्य असली तरी यावेळी या मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे सुरेंद्रन यांचा उमेदवारी अर्ज भरताना गुरुवारी केंद्रीयमंत्री स्मृती इराणीबरोबर असतील. इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये विकासाला मोठी गती मिळाली आहे. अमेठीतील आव्हानांप्रमाणे वायनाडमध्येही विकासाचे आव्हान आहे. अमेठीमध्ये जसा बदल झाला तसा वायनाडमध्ये घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सुरेंद्रन यांनी व्यक्त केले आहे. इराणी यांना वायनाडमध्ये येण्याचे आमंत्रण देऊन सुरेंद्रन यांनी वायनाडची तुलना अमेठीशी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>>‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

यावेळी वायनाडसह अमेठीतूनही राहुल गांधी निवडणूक लढवण्याची चर्चा केली जात आहे. याबाबत काँग्रेसने मौन बाळगणे पसंत केले असले तरी, संभाव्य स्पर्धेची शक्यता लक्षात घेऊन इराणी यांनी आत्तापासून राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पाऊल टाकले आहे. त्याचाच भाग म्हणून इराणी गुरुवारी वायनाडा दौरा करत असल्याचे मानले जात आहे. २०१४ मध्येही इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २०२४ मध्येही राहुल गांधींविरोधात लढण्याची तयारी असून त्यांचा पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागेल असे इराणी म्हणाल्या होत्या.

भाजपची टीका

राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला असून जिंकण्यासाठी राहुल गांधी बंदी घातलेल्या देशद्रोही ‘पीएफआय’ संघटनेचा राजकीय पक्ष ‘एसडीआयपी’ची मदत घेत असल्याचा आरोप पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केला. देशद्रोहींच्या हाती देश देऊन परिस्थिती बदलणे म्हणजे महोबत्त की दुकान आहे का? काँग्रेसच्या जाहिरातींमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचेच नव्हे राहुल गांधी, सोनिया यांचेही छायाचित्रे नाहीत. पक्षातील प्रमुख नेत्यांची छायाचित्रे जाहिरातीत घेतली तर पक्षाची मते कमी होण्याची काँग्रेसला भीती वाटते का, असे तीन प्रश्न विचारून तावडे यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.