आगामी काळात सायबर युद्धाचा धोका आहे. अतिरेक्यांकडून माहिती बंदीचे म्हणजे माहितीचा पुरवठा खंडित करण्याचे प्रयोग केले जाऊ शकतात, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी लष्कराला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायबर हल्ले व संगणकातील माहिती दुसऱ्याच नियंत्रकांकडून म्हणजे हॅकर्सकडून हाताळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगून ते म्हणाले की, आयसिससारख्या दहशतवादी संघटना या इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांचे मतपरिवर्तन करीत आहेत. उदयोन्मुख भारत हा जागतिक कामकाजात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. आता आपण ज्या जगाशी व्यवहार करतो आहोत ते अस्थिरतेने भरलेले आहे. आपण आपले तंत्रज्ञान नवनवीन लष्करी तंत्रानुसार विकसित केले पाहिजे. सीआयआय व लष्कराचे सिग्नल कोअर यांनी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले की, पारंपरिक लष्कराला पर्याय नाही पण त्यांच्याकडे आता लढण्याच्या जोडीला माहितीचे शस्त्रही असले पाहिजे, दाएश किंवा आयसिसने इंटरनेटचा पुरेपूर वापर केला आहे. त्यांनी लोकांची भरती करणे, पाठिंबा मिळवणे, मतपरिवर्तन करणे यासाठी त्याचा वापर केला. विविध विनाशक यंत्रणांच्या मदतीने एखाद्यावेळी लष्कराची सगळी माहितीच रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. माहिती विकृतीकरण हा पुढता धोका आहे. माहितीचा महापूर निर्माण करून व्यवस्था कोलमडवणे हा त्यात एक प्रकार आहे, त्या माहितीच्या महापुरात तुम्ही महत्त्वाची माहिती शोधू शकणार नाही. लष्कराचेही डिजिटलायझेशन झाले पाहिजे कारण सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे. विघातक तंत्रज्ञानापासूनही लष्कराला आता बचाव करावा लागणार आहे, सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत आघाडीवर आहे पण हार्डवेअर क्षेत्रातही काम करण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Future wars might take place in cyber world says defence minister parrikar
First published on: 24-11-2015 at 03:00 IST