देशातील गंभीर होत चाललेल्या करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष वेधत आझाद यांनी राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्याची सरकारला आठवण करून दिली. "जागतिक आरोग्य संघटनेनं डिसेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता. पण, करोनाला रोखण्यासाठीचा सुवर्णकाळ केंद्र सरकारनं वाया घालवला," असा आरोप आझाद यांनी केला. गंभीर होत चाललेल्या करोना संकटाविषयी गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत भाष्य केलं. आझाद म्हणाले, "करोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे सुवर्ण (महत्त्वाचे) महिने सरकारनं वाया घालवले. जागतिक आरोग्य संघटनेनं डिसेंबर २०१९ मध्येच सावध केलं होतं. त्याचबरोबरच चीन आपला शेजारी देश असल्यानं आपण अधिक सावध असायला हवं होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही देशात महामारी वाढत असल्याचा इशारा दिला होता," अशी टीका आझाद यांनी केली. राज्यसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं. "८ जानेवारीपासून पंतप्रधान आणि राज्यांचे आरोग्य मंत्री या परिस्थितीला तोंड देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मुख्यमंत्री ही लढाई लढत आहेत. देशात ३० जानेवारीला पहिला रुग्ण आढळल्याच्या आधीच सर्व सूचना आणि माहिती देण्यात आली होती. पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. १६२ जणांना शोधण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं हे काम सुरू होतं," असं आरोग्यमंत्री म्हणाले. The Govt wasted the golden months to stop #COVID19. WHO had sounded a warning in Dec 2019. As China is our neighbouring country, we should have been alert first. Congress's Rahul Gandhi had also alerted that an epidemic was looming over us: Congress MP GN Azad in Rajya Sabha pic.twitter.com/rYWvGJLjvp — ANI (@ANI) September 17, 2020 "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थितपणे करोना परिस्थिती हाताळली. त्यांनी स्वतः काळजीपूर्वक परिस्थितीवर नजर ठेवली, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इतिहासात नोंद होईल," असंही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं.