तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे बी. नागराजू या २५ वर्षीय तरुणाने अश्रीन सुल्ताना सय्यद या मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून बुधवारी (४ मे) भररस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मुलीच्या भाऊ मुबीन अहमद सय्यद याने आपल्या बहिणीने आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून नागराजूची हत्या केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे नागराजूने आपल्या मुस्लीम पत्नीला ईद निमित्ताना चारमिनार येथे खरेदी करता यावी म्हणून स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडली. मात्र, त्यांचं हे आंतरधर्मीय प्रेम खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलं.

नागराजूच्या हत्येनंतर तो हैदराबादमध्ये ज्या कार शोरूममध्ये काम करत होता त्याच्या मॅनेजरने सांगितलं, “मला नुकतंच नागराजूने पत्नीला ईदसाठी खरेदी करता यावं म्हणून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन विकल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांच्या लग्नाबद्दल समजलं होतं. नागराजूने २५ हजार रुपयांना आपल्या गळ्यातील सोन्याची चैन विकली आणि पत्नीच्या आनंदासाठी ईद साजरी करत चारमिनार येथे खरेदी केली. तो एक कष्टाळू, निरागस आणि प्रामाणिक व्यक्ती होता.”

अश्रीनच्या भावाला तिने आंतरधर्मीय लग्न केल्याचा राग

“दररोज तो काम संपलं की शोरुमचा गणवेश काढून त्याचे कपडे घालायचा. मात्र, बुधवारी तो गणवेश न बदलताच धावपळ करत गेला. त्याला त्याच्या पत्नीला तिच्या बहिणीच्या घरून घ्यायचं होतं,” असंही कार शोरूमच्या मॅनेजरने नमूद केलं. बुधवारी नागराजूवर हल्ला झाला तेव्हा तो पत्नी अश्रीनला बहिणीच्या घरून आपल्या घरी घेऊन जात होता. अश्रीनच्या भावाला तिने आंतरधर्मीय लग्न केल्याचा राग होता. त्यामुळे अश्रीनला काही होऊ नये म्हणून नागराजू कामावर जाताना तिला बहिणीच्या घरी सोडायचा आणि काम संपलं की पुन्हा तिथून घरी घेऊन जायचा.

हेही वाचा : “मी हात जोडून विनंती करत राहिले पण…”; मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्रीनच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने अखेर पळून जाऊन लग्न

नागराजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावचा रहिवासी होता, तर त्याची पत्नी सुलताना त्याच्या शेजारच्या घनापूर गावात राहत होती. दोघे सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण सुलतानाचे कुटुंब नागराजूच्या विरोधात होते. ३१ जानेवारी रोजी नागराजू आणि सुलतानाने पळून जाऊन लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले होते.