Hybrid Terrorists Of Lashkar e Taiba: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादाविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान, या भागात, बुधवारी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले असून, शोपियानच्या बास्कुचन भागात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांची नावे इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी आहेत. दोघेही लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंधित होते आणि ते हायब्रिड दहशतवादी म्हणून काम करायचे. सामान्य लोकांसारखे जगणारे, परंतु गुप्तपणे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यांना हायब्रिड दहशतवादी म्हटले जाते. हे हायब्रिड दहशतवादी, दहशतवादी म्हणून सूचीबद्ध नसतात परंतु दहशतवादी हल्ला करण्यासाठी ते पुरेसे कट्टरपंथी असतात.
पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली तेव्हा परिस्थिती पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शोधमोहिमेदरम्यान त्यांच्याकडून दोन एके-५६ रायफल, चार मॅगझिन, १०२ जिवंत काडतुसे (७.६२×३९ मिमी), दोन हातबॉम्ब आणि दोन पाउच जप्त करण्यात आले.
शोपियान पोलिसांनी संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान या दहशतवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे परिसरातील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.
“या परिसरातील एका बागेत दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्यानंंतर परिसराला प्रभावीपणे वेढा घालण्यात आला होता. सैन्याच्या जलद आणि धोरणात्मक कारवाईमुळे लष्कर-ए-तैयबाच्या दोन हायब्रिड आत्मसमर्पण केले, ज्यामुळे संभाव्य चकमक टळली,” असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
दरम्यान २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका परदेशी नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने कठोर पाऊले उचलत पाकिस्ताव व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त झाले होते.
भारतीय लष्कराचे प्रत्युत्तर
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. मात्र, भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हे हल्ले परतावून लावले होते. याचबरोबर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाई पाकिस्तानच्या काही हवाई तळांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने हालचाली वाढवत भारताबरोबर शस्त्रविराम केला होता.