Donald Trump on India-Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावावर शस्त्रविरामाचा तोडगा काढल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. १० मे रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळाआधी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या परस्पर घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमधील अमेरिकन लष्करातील जवानांना संबोधित करत असताना घुमजाव केले आहे. ते म्हणाले, “मी हे नाही म्हणणार की माझ्यामुळेच झाले. पण मागच्या आठवड्यात भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात माझी मदत झाली, हे खात्रीने सांगतो.”
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “दोन्ही देशात तणाव वाढत चालला होता आणि तुम्ही पाहिले की, वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा वापर होताना दिसत होता. आम्ही दोन्ही देशांशी व्यापाराबद्दल बोललो. युद्धाऐवजी आपण व्यापार करूया, असे सांगितले. भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हा प्रस्ताव आवडला. ते दोघेही आनंदी असून त्यांनी हा मार्ग निवडला.”
“भारत आणि पाकिस्तानमध्ये हजार वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मी फक्त एवढेच म्हणालो की, ही समस्या मी सोडवू शकतो. मी कोणतीही समस्या सोडवू शकतो. मला फक्त सांगा. चला पुन्हा एकत्र येऊया (भारत-पाकिस्तान). आणखी किती वर्ष लढत राहणार? हजार की कितीतरी वर्षांपासून त्यांच्यात संघर्ष आहे. मला त्याबद्दल निश्चित माहीत नाही”, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
तसेच अमेरिकन जवानांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला सांगतो. ते खरोखरच नियंत्रणाबाहेर जाणार होते. पण आम्ही तो प्रश्न सोडवला. आता सर्व आनंदी आहेत.
याआधी ट्रम्प काय म्हणाले होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. ट्रुथ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर झालेल्या चर्चेनंतर मला हे जाहीर करायला आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला
तथापि, भारताने मात्र ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहा मुद्दयाचे निवेदन जाहीर करत अमेरिकेने शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच शस्त्रविरामासाठी व्यापार कारणीभूत नसल्याचेही म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओंनी केलेल्या चर्चेच्या आधारावरच शस्त्रविरामाचा निर्णय घेण्यात आल्याचे भारताने ठामपणे सांगितले.