Manipur Violence : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. जागोजागी जाळपोळ सुरू असल्याने आरोग्य व्यवस्थाही बिघडली आहे. राज्यातील अनेक सरकारी रुग्णालये इम्फाळ येथे आहेत. राज्य सरकारद्वारे चालवले जाणारे जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल आणि केंद्राद्वारे चालवले जाणारे रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटल इम्फाळमध्ये आहे. शिजा हॉस्पिटल्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि राज मेडिसिटी यांसारखी महत्त्वाची खाजगी रुग्णालये देखील येथेच आहेत. या रुग्णालयांमध्ये मैतई समाजाचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे कुकी-झोमी समुदायाच्या लोकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. या समुदायाचे अस्तित्तव डोंगराळ भागात सर्वाधिक आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सर्वात मोठे सरकारी रुग्णालय चुराचंदपूर जिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कुकी-झोमीचे समाजाचे वर्चस्व आहे. तर काही रुग्णालयांमध्ये ओपीडीच्या वेळेस रुग्णांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचीही कमतरता आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना विशेष काळजी आणि उपचारांची गरज आहे त्यांना राज्याबाहेर जावं लागतं. मिझोरामची राजधनी आयझॉलसुद्धा १२ तासांच्या अंतरावर आहे. हिंसाचारावेळी सहा रुग्णांच्या छातीत गोळी लागली होती, कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रियेसाठी सुविधा नसल्यामुळे त्यांना विमानाने गुवाहाटी येथे नेण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कांगपोकपी येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरही कुकी बहूल भाग आहे. येथेही मर्यादित सुविधा आहेत, परंतु रहिवाशांना जवळच्या राजधानीत उपचारांसाठी जाणे तुलनेने सोपे आहे. कारण, नागालँडमधील कोहिमा तीन तासांच्या अंतरावर आहे. तेथे ते उपचारांसाठी जाऊ शकतात.

परंतु इतरत्र उपचार घेणे प्रत्येकाला परवडणारे नाही. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, उपचारांचा अभाव यामुळे अनेकांनी स्वखर्चाने खाजगी रुग्णालयात उपचार केले आहेत. चुरचंदपूर येथील रुग्णालयात सध्या बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या यंत्रणेसह अगदी मूलभूत गरजांचीही कमतरता आहे. डॉक्टरांचेच म्हणणे आहे की रुग्णालय “निकृष्ट दर्जाच्या” मार्गाने काम करत आहे.

दोन समूदायातील भांडणामुळे डॉक्टर विस्थापित

मणिपूरच्या रुग्णालयांतील अनेक कर्मचारी विस्थापित झाले आहेत. रुग्णालयातील ६० पैकी १६ तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी मैतई समाजाचे असल्याने त्यांना जिल्हा सोडावा लागला. यादरम्यान, डायलिसिस केंद्रही काही दिवस बंद पडले आहे. कारण या सेंटरचे तंत्रज्ञही इंफाळचे होते. आता, एक सशुल्क स्वयंसेवक त्यावर अवलंबून असलेल्या २५ रुग्णांना डायलिसिसचे व्यवस्थापन करतो. २५ पेक्षा अधिक रुग्णांवर येथे उपचार केले जात नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्ण भगवान भरोसे

रोलियानपुई (५४ वय) यांना जानेवारी महिन्यात स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. मार्चमध्ये इंफाळमधील RIMS हॉस्पिटलमध्ये त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी तिथे केमोथेरपीचे उपचार सुरू केले. मे महिन्यात हिंसाचार सुरू होण्यापूर्वी त्यांनी दोन सत्रे पूर्ण केली होती. त्यांची सहा सत्रे शिल्लक होती, परंतु हिंसाचारामुळे त्या सत्र पूर्ण करू शकल्या नाहीत. अखेर वैतागून त्यांनी हा विचारच सोडून दिला. आयझॉलपर्यंत रोज प्रवास करणे माझ्यासाठी खूप कठीण बाब आहे. शारीरिकदृष्ट्या ते शक्य होणार नाही. उपचारासाठी आयझॉलमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. म्हणून मी देवावर विसंबून राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं त्या हतबलपणे म्हणाल्या.