यजमान इंग्लंडने अखेर भारताला विश्वचषक स्पर्धेत पराभवाची चव चाखायला लावली. लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली. कर्णधार विराट कोहली अर्धशतकी खेळी करून माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यावेळी भारताला जलद धावा करण्याची गरज होती. ऋषभ पंतने सुरुवातीचे चेंडू जपून खेळले. त्यानंतर त्याने फटकेबाजीला सुरुवात केली. पण ४ चौकारांसह १९ चेंडूत २२ धावा करून तो माघारी परतला.
दिनेश कार्तिक सारखा अनुभवी खेळाडू संघात असताना ऋषभ पंतला प्राधान्य का असा सवाल चाहत्यांकडून विचारण्यात आला. पंतच्या समावेशावरुन अनेक चर्चा रंगल्या. पण मास्टर ब्लास्टर सचिव तेंडुलकर याला मात्र ऋषभच्या खेळीने प्रभावित केले. पंतच्या खेळीबाबत इंडिया टुडेशी बोलताना सचिन म्हणाला की ऋषभ मैदानात आला आणि त्याने फलंदाजी करून एक चांगली खेळी केली. तो कायम एक उत्तम खेळाडू म्हणून खेळतो. मी तर त्याला डायनामाईट म्हणजेच स्फोटक फलंदाज मानतो. पण (विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत) जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होते, तेव्हा त्याच्या वाटची षटके कोण टाकणार? या गोष्टीकडेदेखील पाहणे तितकेच गरजेचे आहे.
दरम्यान, ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असं वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला माघारी धाडलं. त्याने ६६ धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र इतर कोणत्याही खेळाडूने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यामुळे भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडकडून प्लंकेटने ३ तर वोक्सने २ बळी घेतले.