नवी दिल्ली : मधुमेहाचा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना करोनाची लस तर द्यावीच पण तिसरी मात्राही आवश्यकता असल्यास द्यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मधुमेहाचे निदान लवकर होण्यासाठी वॉकॅथॉन, मॅराथॉन, तपासणी शिबिरे घेण्याचे आवाहन आयएमएने रविवारी केले असून समाज माध्यमांवरूनही जनजागृती करण्यात यावी, असे म्हटले आहे. जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने दहा दिवस एक अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचा आयएमएचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले. आयएमएने असोसिशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, आरएसएसडीआय, एनडॉक्टरिन सोसायटी व इतर संघटनांचे सहकार्य घेतले आहे. २०२१ मध्ये मधुमेहाने ६७ लाख लोक मरण पावले असून २० ते ७९ वयोगटातील ५३७ दशलक्ष लोकांना मधुमेह आहे, असे सांगण्यात आले. जगात मधुमेही लोकांची संख्या २०३० पर्यंत ६४३ दशलक्ष तर २०४५ पर्यंत ७८४ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. भारतात ७७ दशलक्ष प्रौढांना मधुमेह असून हे प्रमाण २०४५ पर्यंत १३४ दशलक्ष होणार आहे. सर फ्रेडेरिक बँटिंग यांच्या सन्मानार्थ जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. बँटिंग यांचा जन्म १४ नोव्हेंबरला झाला होता. त्यांनी चार्लस बेस्ट यांच्या समवेत १९२२ मध्ये इन्शुलिनचा शोध लावला होता. यंदाच्या जागतिक मधुमेह दिनाची मध्यवर्ती कल्पना ही मधुमेहाची काळजी या स्वरूपात आहे. इन्शुलिनच्या शोधानंतर शंभर वर्षांनंतरही आज मधुमेही रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नाहीत.