पीटीआय, गुवाहाटी
आसाममधील पूरस्थिती सुधारत असून पूरबाधितांची संख्या कमी होऊन ३.३७ लाख इतकी झाली आहे. तसेच आता २१ जिल्ह्यांऐवजी १२ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारपर्यंत राज्यात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या २३ इतकी होती. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू चिखलाखाली अडकून झाला. राज्यातील ब्रह्मपुत्रेसह महत्त्वाच्या नद्यांची पातळी ओसरत असून काहीच ठिकाणी त्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली नौकासेवा आता दिवसाच्या वेळी सुरू करण्यात आली आहे. धुब्रीमध्ये ब्रह्मपुत्रा, धरमतलमध्ये कोपिली, बीपी घाट येथे बराक आणि श्रीभूमी येथे कुशियारा या नद्या शनिवारी संध्याकाळपर्यंत धोक्याच्या पातळीवरू वाहत होत्या. सध्या १२ जिल्ह्यांच्या ९९९ गावांमधील ३ लाख ३७ हजारांपेक्षा जास्त लोक पूरबाधित आहेत.