राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही राज्ये हातातून गेल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. पण, ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांनी बैठकीला येण्याचं टाळलं होतं. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता, १९ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशाच्या मतमोजणीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ६ डिसेंबरला ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली होती. पण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नियोजित कार्यक्रमामुळे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी मिचाँक चक्रीवादळामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला येणं टाळलं होतं. यामुळे बैठक पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट करत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. ‘एक्स’वर जयराम रमेश म्हणाले, “इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत समान किमान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.