नवी दिल्ली : हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबरला केलेला हल्ला हे आपण ‘दहशतवादी कृत्य’च मानतो, असे सांगतानाच पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला भारताचा पाठिंबा कायम असल्याचे पररा ष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. इस्रायल आणि पॅलेस्टाईन शेजारी-शेजारी शांततेने नांदावेत, यासाठी चर्चेतून मार्ग काढला गेला पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> इस्रायलचा सीरियावर हल्ला; दोन महत्त्वाच्या विमानतळांवरील सेवा खंडित
शनिवारी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याचा निषेध करून इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणातही त्यांनी हमासवरील कारवाईला पाठिंबा देऊ केला होता. त्यानंतर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बागची यांनी पॅलेस्टाईनबाबत आपल्या भूमिकेत बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्याच वेळी कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध लढणे ही जागतिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
इस्रायल हे कसे करते, ते महत्त्वाचे आहे. अतिरेकी आणि लोकशाही राजवटींमधील फरक हा मानकांमुळे आपण स्पष्ट करत असतो.. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
– अँटोनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका
महत्त्वाचे काय घडले?
* ओलिसांची सुटका केल्याशिवाय गाझामध्ये वीज, पाणी नाही – इस्रायलचा इशारा
* गाझा पट्टीमध्ये अन्न, पाणी, औषधांचा तुटवडा
* आपल्या दमास्कस, अलेप्पो विमानतळांवर इस्रालयने हवाई हल्ला केल्याचा सीरियाचा आरोप
* ५७ मुस्लीम देशांची संघटना, ओआयसीकडून इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध
* भारतीयांशी संपर्क साधण्यास वकिलातीकडून सुरुवात.