पीटीआय, व्हिएन्ना

पाकिस्तान सतत आपल्या देशातून दहशतवादाला खतपाणी घालून भारतात दहशतवादी कारवाया घडवत असतो. पाकिस्तान हे दहशतवादाचे उगमस्थान आहे. खरे तर याहून कठोर शब्द मी वापरू शकलो असतो, अशी टीका भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे केली. अशा दहशतवादाची चिंता जगाने करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
United Nations
इस्रायल-हमास युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रासंघाचा ठराव, भारत मात्र गैरहजर; नेमकं कारण काय?
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका

पाकिस्तानला सातत्याने दहशतवादाचे केंद्र संबोधणाऱ्या जयशंकर यांनी ऑस्ट्रियाची राष्ट्रीय वाहिनी ‘ओआरएफ’ला मुलाखत दिली. याववेळी पाकिस्तानच्या गेली अनेक दशके सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानला समज न देता, टीका न करता याबाबत सोयीस्कर मौन बाळगल्याबद्दल युरोपीय देशांवरही त्यांनी टीका केली.

पाकिस्तानसाठी ‘दहशतवादाचे उगमस्थान’ हे शब्दयोजन केल्यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले, की आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहोत म्हणून मूळ मुद्दा थेट न सांगता घोळवून सांगावा, असे अजिबात नाही. पाकिस्तानसंदर्भात मी केंद्र या शब्दापेक्षा अधिक कठोर शब्द वापरू शकलो असतो. भारताच्या बाबतीत जे काही घडलंय, ते पाहता ‘केंद्र’ हा शब्द अधिक मुत्सद्दी आहे, याची खात्री बाळगा.

पाकिस्तानचा संदर्भ देत ते म्हणाले, की काही वर्षांपूर्वी भारताच्या संसदेवर हल्ला करणारा, मुंबईवर हल्ला करणारा, हॉटेल आणि परदेशी पर्यटकांवर हल्ले करणारा आणि सीमेपलीकडून दररोज भारतात दहशतवादी पाठवणारा, असा हा देश आहे. ज्या देशातील शहरांत दिवसाढवळय़ा दहशतवादी अड्डे सुरू असतात, दहशतावाद्यांची भरती होत असेल, त्यांना निधी मिळत असेल तर पाकिस्तान सरकारला काय घडत आहे याची जाणीव नसेल का? दहशतवाद्यांनी विशेषत: लष्करी स्तरावर प्रशिक्षण दिले जाते तेव्हा पाकिस्तान सरकार कसे अनभिज्ञ असेल का? जेव्हा आपण सैद्धांतिक तात्विक निर्णयांबाबत बोलतो तेव्हा अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकारांबाबत युरोप पाकिस्तानवर जोरदार टीका करून, कठोर भूमिका का घेत नाही?

यापूर्वी ऑस्ट्रियाच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचा संदर्भ देत नाव न घेता जयशंकर म्हणाले होते, की सीमेपलीकडील दहशतवाद विशेषत: अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी आणि इतर प्रकारच्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी संबंधित असतो, तेव्हा तो एका प्रदेशापुरताच मर्यादित असूच शकत नाही. दुर्दैवाने त्याचे केंद्र भारतालगतच आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोमवारी त्यांचे ऑस्ट्रियन परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर श्ॉलेनबर्ग यांच्याशी जागतिक स्थिती व प्रादेशिक आव्हानांसंदर्भात खुलेपणाने सार्थ चर्चा केली. दोन्ही बाजूंनी ‘इमिग्रेशन’ व भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांसाठी प्रवास सुलभतेसह अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

चीनकडून ताबारेषेत बदलांचे प्रयत्न
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की चीनने भारतासोबत सीमेसंदर्भात केलेल्या करारांचे पालन केले नाही आणि प्रत्यक्ष ताबारेषेवर (एलएसी) एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच उभय देशांत तणावह्णह्ण आहे. ऑस्ट्रियाच्या राष्ट्रीय वाहिनीस ‘ओआरएफ’ला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी सांगितले, की भारत व चीनने सीमाभागात मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा दल न ठेवण्याचा करार केला आहे. तथापि, चीनने त्या करारांचे पालन केले नाही. जयशंकर म्हणाले, की आम्ही एकतर्फी प्रत्यक्ष ताबारेषेत (एलएसी) बदल न करण्याचा करार केला होता. तो त्यांनी (चीनने) एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने करारांचे पालन केले नाही, असे चीनने म्हटले तर काय होईल या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, की यासंदर्भातील नोंदी अगदी स्पष्ट असल्याने चीनला असे सांगणे कठीण जाईल. या संदर्भातील उपग्रहांच्या प्रतिमा अधिक स्पष्ट आहेत. सीमेवर प्रथम सैन्य कोणी पाठवले, याचा मागोवा घेण्यासाठी या नोंदी स्पष्ट आहेत.

जगाने दहशतवादाची चिंता करावी
भारत व पाकिस्तानात युद्धाच्या शक्यतेमुळे जगाला चिंता वाटावी का? असे विचारले असता जयशंकर म्हणाले, की जगाने दहशतवादाबद्दल चिंता वाहिली पाहिजे. मला वाटते की दहशतवाद बोकाळला आहे व जग त्याकडे न पाहता भलतीकडेच पाहत आहे. उर्वरित जगाला असे वाटते, की दहशतवाद ही आपली समस्या नाही कारण त्याची झळ दुसऱ्या देशाला पोहोचत आहे. दहशतवादाबाबत जगाने आता काळजी घेतली पाहिजे.