Salman Khurshid : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठी कारवाई केली. भारताने केलेल्या या कारवाईनंतर ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारत सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताची भूमिका मांडत आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसचे काही नेते केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांना पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील अनेकवेळा मोदी सरकारच्या थोरणांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी देखील केंद्रातील भाजपा सरकारच्या धोरणांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर भाष्य करत सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.
एवढंच नाही तर सलमान खुर्शीद यांनी भाजपा सरकारच्या धोरणांना पाठिंबा दिल्याचंही पाहायला मिळालं आहे. सलमान खुर्शीद यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताला परत करावे, या भारताच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीलाही त्यांनी दुजोरा दिला. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हे सध्या आशिया दौऱ्यावर असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य आहेत. या दौऱ्यादरम्यान खुर्शीद यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचं कौतुक केलं. तसेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराचंही कौतुक केलं.
सलमान खुर्शीद यांनी काय म्हटलं?
“काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून एक मोठी समस्या होती. कलम ३७० मुळे असं वाटत होतं की हा भाग देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे. पण कलम ३७० रद्द करण्यात आल्यामुळे ही एक मोठी समस्या संपली आहे. या निर्णयानंतर तेथे निवडणुका झाल्या आहेत, त्या निवडणुकीत ६५ टक्के लोकांनी सहभाग घेतला. आज काश्मीरमध्ये निवडून आलेलं सरकार सत्तेत आहे, त्यामुळे जे काही घडलं त्यावर लोक आनंदी आहेत. तसेच आम्हाला काश्मीरमधील समृद्धी परत आणायची आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या संविधानाच्या कलम ३७० मुळे काश्मीर हा भारताच्या इतर भागापासून वेगळा आहे अशी धारणा निर्माण झाली होती. पण केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर ही धारणा संपुष्टात आली”, असं म्हणत सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारने घेतलेल्या कलम ३७० रद्दच्या निर्णयाचं कौतुक केलं.
सलमान खुर्शीद यांनी पुढे म्हणाले की, “काश्मीर आणि आम्ही एकत्र कुटुंबाचा भाग आहोत. कोणालाही सोडून देण्यास सांगितलं जाऊ शकत नाही. कोणीही आमचं कुटुंब तोडू शकत नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तानशी चर्चा तेव्हाच होऊ शकते जेव्हा शांततेसाठी वचनबद्धता असेल आणि दहशतवादी कारवायांना पूर्णपणे थांबवल्या जातील”, असंही सलमान खुर्शीद यांनी म्हटलं.