India-Pakistan Tensions: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेवरील काही शहरांवर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दरम्यान पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यांत सीमेलगतच्या शहरांमधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरच्या पूंच्छ जिल्ह्यातील डुंगस परिसरातील एका कुटुंबातील १४ वर्षीय झोया खान आणि तिचा भाऊ १२ वर्षीय झैन खान यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचे वडील रमीज खान जखमी झाले आहेत. तर, दुसऱ्या कुटुंबातील त्याच वयाचे दोन भावंडे, अयान खान (१४) आणि अरुबा खान (१२) यांचाही गोळीबारात मृत्यू झाला आहे.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “नियंत्रण रेषेवरील शाळांना लक्ष्य करत निष्पाप मुलांवर केलेला गोळीबार हे पाकिस्तानच्या क्रूर आणि दहशतवादी मानसिकतेचे पुरावे आहेत. पूंछ (जम्मू) येथील क्राइस्ट स्कूलजवळ झालेल्या गोळीबारात झोया आणि झियान या दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश संतापला आहे. मी दोन्ही निष्पाप मुलांना श्रद्धांजली वाहतो. या दुःखाच्या वेळी संपूर्ण भारत त्यांच्यासोबत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या धैर्याला आणि शौर्याला मी सलाम करतो, जे प्रत्येक आव्हानात देशासोबत खंबीरपणे उभे राहतात.”
धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, “पाकिस्तानचे हे नापाक कृत्य मानवतेच्या प्रत्येक तत्वाचे आणि मानवी संस्कृतीच्या प्रत्येक मर्यादेचे उल्लंघन आहे. दहशतवादाला आपले सरकारी धोरण बनवून जगभर दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानबद्दलचे सत्य संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने लक्षात ठेवावे की, भारत अशा भ्याड कृत्यांना विसरत नाही आणि माफही करत नाही. भारतीय लष्कर अशा भ्याड कृत्याला योग्य उत्तर देईल.”
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत-पाकिस्तानमधील लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक स्तरावरील चर्चेनंतर, दोन्ही देशांनी शस्त्रविरामास सहमती दर्शविली होती. काल सकाळी पाकिस्तानी सैन्य भारतीय नागरिक आणि लष्करी तळांना सतत लक्ष्य करत होते. याला भारतीय लष्कराने जबरदस्त प्रत्युत्तर देत शस्त्रागारात उपलब्ध असलेल्या अधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि आत्मघाती ड्रोन्स यासारख्या शस्त्रांचा वापर केला आहे. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
यावेळी रफीकी, मुरीद, नूर खान, रहीम यार खान, सुक्कूर आणि चुनियान येथील पाकिस्तानी हवाई तळ भारतीय लष्कराचे लक्ष्य होते. भारतीय हल्ल्यांमध्ये या सर्व हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय स्कार्दू, भोलारी, जेकबाबाद आणि सरगोधा या विमानतळांचेही मोठे नुकसान झाले. याशिवाय, पसरूर आणि सियालकोट येथील रडार साइट्सना अचूक शस्त्रास्त्रांचा वापर करून लक्ष्य करण्यात आले, असेही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.