India-Pakistan Tension : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. यादरम्यान पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संरक्षण उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या भारत फोर्ज आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या डिफेन्स डिव्हीजनसह अनेक खासगी कंपन्यांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खाजगी पुरवठादारांना विशिष्ट दारूगोळ्याचा पुरवठा वाढवण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये अँटी-ड्रोन आणि स्मार्ट अम्युनिशन यासह आर्मड व्हेकल्स ज्यांच्यावर विविध शस्त्रास्त्रे जसे की, लोइटेरिंग (loitering) म्युनिशन्स आणि गायडेड क्षेपणास्त्र जोडता येतील अशा उपकरणांचा समावेश आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे

या खाजगी कंपन्याना त्यांच्या ऑर्डनन्स कारखान्यांमध्ये सध्या तयार केल्या जात असलेल्या साहित्यामध्ये वाढ करून ठरवून दिलेल्या दारूगोळ्यासह इतर काही वस्तूंचे उत्पादन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या पुरवठादारांना आढावा बैठकीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे.

भारत फोर्ज कंपनीची पुण्याच्या जवळ जेजुरी येथे मोठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, जेथे बंदुका, वाहने, लहान आणि मध्यम आकाराची शस्त्रे, आणि प्रणालींची असेंब्ली आणि इंटिग्रेशन केले जाते. या कंपनीने या वर्षी संरक्षण मंत्रालयाबरोबर १८४ स्वदेशी बनावटीच्या अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम्स (ATAGS) पुरवठा करण्याबाबातचा एक अत्यंत महत्त्वाचा करार केला होता. १५५/५२ मिमी कॅलिबर ATAGS हे डीआरडीओ बरोबर मिळून संयुक्तपणे विकसित करण्यात आले आहे.

स्वदेशी बनावटीचे ATAGS हे ४८ किलोमीटरपर्यंत मारा करू शकते आणि याचे काम ऑल-इलेक्ट्रिक ड्राइव्हजवर चालते यामुळे हायड्रॉलिक ड्राइव्हच्या तुलनेत याच्या कसल्याही देखभालीची गरज पडत नाही. ८ किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या टोव केलेल्या गन्सच्या तुलनेत हे १८ किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. तसेच ATAGS चा फायरिंग रेट टोव केलेल्या गन्सच्या ३ शेल्सच्या तुलनेत सहा शेल्स इतका आहे. सध्या अस्तित्वात असलेले अम्युनिशन देखील कुठल्याही सुधारणेशिवाय ATAGS मधून यशस्वीरित्या डागले जाऊ शकते.

महिंद्रा कंपनीने देखील सरकारकडून लहान शस्त्रे आणि त्यासाठी लागणारे अम्युनिशन तयार करण्याचा परवाना मिळवला आहे. यासह या कंपनीकडून भारतीय सैन्यासाठी आर्मर्ड कॅरिअर्स आणि नॉन-आर्मर्ड मोबिलिटी सोल्यूशन्स तयार केले जातात. कंपनी शहरी भागाती युद्धासाठी डिझाइन केलेले मार्क्समन हे लष्करी वाहन आणि रक्षक हे आर्मर्ड मिलिट्री युटिलीटी व्हेकल देखील तयार करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेक इन इंडिया सुरू झाल्यापासून देशातील डिफेन्स प्रॉडक्शन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे उत्पादन आर्थिक वर्ष २४ मध्ये १.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या सुमारे ६५ टक्के संरक्षण उपकरणे देशातच तयार केली जातात. विशेष म्हणजे एका दशकापूर्वी ६५-७० टक्के संरक्षण उपकरणे ही आयत केली जात होती. भारत फोर्ज, महिंद्रा आणि टाटा ग्रुप या खाजगी क्षेत्रातील कंपन्या भारताच्या संरक्षण उपकरणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आर्थिक वर्ष २४ मध्ये एकूण संरक्षण उत्पादनात २१ टक्के योगदान या कंपन्यांचे आहे.