Operation Sindoor: गुरुवारी मध्यरात्री भारत-पाकिस्तान सीमारेषेवर मोठ्या घडामोडी घडल्या. पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय लष्करानं पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. यात जवळपास ५० पाकिस्तानी ड्रोन भारतानं पाडल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या आगळिकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरच्या अनेक भागात ब्लॅकआऊट्स पाळण्यात आला. पाकिस्तानच्या या आततायी कृत्यानंतर भारतानं आपली भूमिका ठाम शब्दांत स्पष्ट केली आहे.

कधीपर्यंत चालणार हा तणाव?

भारताकडून वारंवार पाकिस्तानला आपल्याकडून तणाव वाढवणारी कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं बजावल्यानंतरदेखील पाकिस्तानकडून सातत्याने सीमापलीकडून कारवाया केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जात आहे. मात्र, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यापासून सीमेवर सातत्याने पाकिस्तान कारवाया करत आहे.

यानंतर भारतानं ७ मे च्या पहाटे पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीत एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यानंतर पाकिस्तानकडून कारवाया वाढवल्या जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नेमका हा तणाव कधीपर्यंत आणि कुठपर्यंत चालणार? अशी चर्चा चालू असताना गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे.

“…तर आम्ही शेवटपर्यंत जाऊ”

“जर पाकिस्तान अशाच प्रकारे हल्ले करत राहिलं, आणखी पुढे गेलं तर आम्ही थांबणार नाही. आम्ही मग अगदी शेवटपर्यंत जाऊ”, अशा शब्दांत भारतानं गुरुवारी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ऑपरेशन सिंदूरशी संबंधित केंद्र सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. भारतीय लष्करानं लाहोर येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टीम उद्ध्वस्त केल्यानंतर इतरही काही ठिकाणी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. त्यानंतर केंद्र सरकारनं हा इशारा दिला आहे.

“भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या निर्माण झालेल्या लष्करी तणावावर निश्चित असं उत्तर सध्या नाही. कारण या सर्व प्रकरणात भारताची कृती ही पाकिस्तान किती वेगानं तणाव वाढवणाऱ्या गोष्टी करत जातो, त्यावर अवलंबून असेल. आम्ही जी काही परिस्थिती उद्भवेल, त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत”, असं या अधिकाऱ्याने सांगितल्याचंही इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत सरकारची भूमिका स्पष्ट

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर केंद्र सरकारमधील उच्चाधिकाऱ्याने स्पष्ट केलेली ही भूमिका ७ मे रोजी भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर लष्कराच्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या भूमिकेशीच सुसंगत आहे. सुरुवातीपासूनच भारतानं हे स्पष्ट केलं आहे की आमच्याकडून तणाव वाढवणारी कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणात पहिली माघार घेण्याची जबाबदारी पाकिस्तानची असेल. त्यांनी आक्रमक कारवाया केल्या, तर भारताकडून प्रत्युत्तर दिलं जाईल.