India Slams Turkey And Chana: पाकिस्तानशी जवळचे संबंध असलेले तुर्कीये आणि चीन हे दोन्ही देश दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यासाठी पाकिस्तानला आग्रह करतील अशी अपेक्षा भारताने गुरुवारी व्यक्त केली आहे. भारत-तुर्कीये संबंधांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “एकमेकांच्या चिंतांबद्दल संवेदनशीलतेच्या आधारावर संबंध टिकतात.”
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. हे हल्ले करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कीयेचे ड्रोन आणि चीन-निर्मित क्षेपणास्त्रांचा वापर केला होता.
“आम्हाला अपेक्षा आहे की तुर्कीये पाकिस्तानला सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि त्यांनी अनेक दशकांपासून पोसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आग्रह करेल. दोन देशांमधील संबंध एकमेकांच्या चिंतांबद्दल संवेदनशीलतेच्या आधारावर टिकतात,” असे जयस्वाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
जयस्वाल यांनी पुढे असेही सांगितले की, “ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी १० मे रोजी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली होती. यामध्ये त्यांनी चीनला पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेची माहिती दिली होती.”
“चीनला हे चांगलेच ठाऊक आहे की परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता हे भारत-चीन संबंधांचा आधार आहेत,” असे त्यांनी पुढे म्हटले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने तुर्कीयेची ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्रे हवेतच यशस्वीरित्या पाडली होती. तुर्कीने पाकिस्तानला पुरवलेले ड्रोन युक्रेनला पाठवल्या जाणाऱ्या दर्जाचे नव्हते, परंतु कमी किमतीच्या, भारतीय बनावटीच्या ड्रोनने पाकिस्तानने डागलेले अनेक तुर्कीये ड्रोन पाडले होते.
पाकिस्तान उच्चायोगातील दोन कर्मचाऱ्यांना पर्सना नॉन ग्राटा घोषित केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी त्यांच्या अधिकृत दर्जाच्या विसंगत कारवाया करत होते आणि म्हणूनच त्यांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याने भारत सोडला आहे, तर दुसऱ्याला काल भारत सोडण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.