भारताची ‘मार्स ऑरबायटर’ मोहीम अखेर २८ ऑक्टोबरला होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. तज्ज्ञांच्या राष्ट्रीय समितीने ४५० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सांगोपांग चर्चा करूनच ही मान्यता देण्यात आल्याचे समजते. समितीने गेल्या गुरुवार व शुक्रवारी या मोहिमेचा आढावा घेतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी सखोल सादरीकरणही या वेळी केले. या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे ही तांत्रिक स्वरूपाची आहेत व एखादा उपग्रह मंगळाच्या कक्षेत पाठवून प्रयोग करण्याची क्षमता यात आजमावली जाईल. तेथील संभाव्य जीवसृष्टी, लाल ग्रहाची छायाचित्रे, तेथील पर्यावरणाचा अभ्यास अशा अनेक उद्दिष्टांचा समावेश त्यात आहे, समितीने आम्हाला हा प्रकल्प पुढे नेण्यास हिरवा कंदील दिला आहे, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर.राव, प्रसिद्ध अंतराळ तज्ज्ञ रॉजहॅम नरसिंहा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे बंगलोर येथील प्राध्यापक यांचा या योजनेचा आढावा घेणाऱ्या समितीत समावेश होता. आता २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर ही लाँच विंडो जरा लांबणीवर टाकण्यात आल्याने ही मोहीम २८ ऑक्टोबरला होणार आहे, अंतिम तारीख १९ नोव्हेंबर ही कायम ठेवण्यात आली आहे.
आपल्याला प्रथमच अशी संधी मिळत आहे, असे सांगून अधिकारी म्हणाला, की हवामान व्यवस्थित असेल, तर २८ ऑक्टोबरला मार्स ऑरबायटरचे उड्डाण झालेले असेल. मार्स ऑरबायटर मिशनमधील अंतराळयान हे १५० कोटी रुपयांचे असून सध्या त्याच्या कंपन व ध्वनी चाचण्या सुरू आहेत. उपग्रह चाचणीही केली जाईल. ३० सप्टेंबरला हे यान श्रीहरिकोटा या अंतराळ बंदराकडे पाठवले जाईल.
कसे जाईल मंगळावर?
पृथ्वीच्या कक्षेतून सुटल्यावर ते दहा महिने खोल अवकाशात प्रवेश करील व सप्टेंबर २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत जाईल. नंतर ते मंगळाभोवती अंडाकार कक्षेत (३७२ कि.मी बाय ८० ००० किमी) मध्ये प्रवेश करील. मंगळावर मिथेन आहे किंवा नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न यात केला जाईल. मंगळवर जीवसृष्टी असण्यासाठी तिथे मिथेन असणे गरजेचे आहे.