Air India-Indigo Flight Cancel : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अखेर १० मे रोजी शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली.
सध्या भारत आणि पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. मात्र, तरी देखील दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगोने आज (१३ मे) रोजी अनेक शहरांमधील उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशातील तणाव आणि हवाई निर्बंध व सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इंडिगोने कोणत्या शहरातील उड्डाणे स्थगित केली?
इंडिगोने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एका निवेदनात एअरलाइनने म्हटलं की, “काही शहरातील विमानांची उड्डाणे स्थगित केल्यामुळे तुमच्या प्रवासाला कसा व्यत्यय येऊ शकतो याची आम्हाला कल्पना आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. मात्र, परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून पुढील अपडेट्सची माहिती तुम्हाला देऊ.”
एअर इंडियाने कोणत्या शहरातील उड्डाणे स्थगित केली?
एअर इंडियाने जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे आज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती देताना एअरलाइनने म्हटलं आहे की, “सध्याच्या घडामोडी लक्षात घेता आणि तुमच्या सुरक्षिततेचा विचार करता जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच तुम्हाला पुढची अपडेट देत राहू”, असं म्हटलं आहे.