Mohammad Javad Hosseini on Israel Iran war : इस्रायल आणि इराणमधील तणावादरम्यान अमेरिकेची भूमिका व रणनितीमुळे इराणमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे स्थिती आणखी संवेदनशील बनली आहे. ट्रम्प म्हणाले, “गरज पडल्यास पाकिस्तान अमेरिकेच्या कामी येऊ शकतो. पाकिस्तान इस्रायलच्या विरोधात नाही. जनरल मुनीर इराणला चांगलेच ओळखून आहेत. ते अमेरिकेच्या भूमिकेशी सहमत आहेत”.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इराणने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील इराणी दूतावासाचे उपाध्यक्ष मोहम्मद जवाद होसैनी यांनी यावर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की पाकिस्तान अमेरिकेकरवी एक कार्ड म्हणून वापरलं जाणार नाही”. म्हणजेच पाकिस्तान अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणार नाही.
“पाकिस्तान त्या मार्गाने जाणार नाही”, इराणला विश्वास
इराणच्या या वक्तव्याने त्यांची चिंता स्पष्ट झाली आहे. अमेरिका त्यांच्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर करेल अशी इराणला भिती आहे. यामुळे पश्चिम आशियाची स्थिती अधिक अस्थिर होऊ शकते. इराणने इस्रायलबरोबरच्या तणावादरम्यान पाकिस्तानबाबत विश्वास दर्शवला आहे. होसैनी म्हणाले, “मला विश्वास आहे की पाकिस्तान त्या मार्गाने जाणार नाही. पाकिस्तान हा इस्रायली हल्ल्यांविरोधात इराणबरोबर उभा राहील”.
पाकिस्तान इस्रायलविरोधात अमेरिकेची मदत करणार?
होसेनी यांना विचारण्यात आलं होतं की पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर अमेरिका पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारची लष्करी मदत घेऊ शकेल का? यावर उत्तर देताना होसेनी म्हणाले, “पाकिस्तान इराणबरोबर उभा राहील. ते अमेरिकेला इस्रायलविरोधात लष्करी मदत करणार नाहीत”.
इराणला भारताकडून मोठी अपेक्षा
होसैनी म्हणाले, “भारतासारखे देश ग्लोबल साउथचा आवाज मानले जातात, जे शांततेचे समर्थक आहेत. अशा संघर्षात त्यांनी सक्रीय भूमिका बजावायला हवी. भारताने उभय देशांशी समन्वय साधत इस्रायलवर दबाव निर्माण करायला हवा. भारताने सर्वप्रथम इस्रायलच्या आक्रमकतेची निंदा करायला हवी”. या वक्तव्याद्वारे होसैनी यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. मोहम्मद जवाद म्हणाले, “ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलने हमासच्या बंदोबस्ताच्या नावाखाली पॅलेस्टिनी लोकांच्या हत्या केल्या होत्या तेव्हाच जगाने इस्रायलचा निषेध केला असता तर आज त्यांनी इराणसारख्या सार्वभौम राष्ट्रावर हल्ला करण्याचा विचार केला नसता”.