Jammu and Kashmir Kishtwar encounter between army and terrorists : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चतरूच्या सिंहपोरा भागात चकमक सुरू झाल्याची घटना समोर आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे तीन ते चार दहशतवाद्यांना या भागात घेरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आता यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. निमलष्करी दलांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेनंतर या दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते.

दोन आठवड्यात ८ जणांचा खात्मा

दरम्यान लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या ‘ऑपरेशन ट्रॅशी’ बद्दल माहिती दिली आहे. या संयुक्त मोहिमेत गोळीबार सुरू झाल्यानंतर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे.

सिंगपोरा चतरू येथे सकाळी ७ वाजता ही चकमक सुरू झाली आहे, ज्यामध्ये दोन पॅरा एसएफ, लष्कराच्या ११ आरआर, ७ वी आसाम रायफल्स आणि एसओजी किश्तवाड यांच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. प्राथमिक माहितीनुसार सुरक्षा दलांनी या भागात तीन ते चार दहशतवादी घेरल्याचे सांगण्यात आले होते, आता त्यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले \. दरम्यान या भागात घेरण्यात आलेले दहशतवादी हे त्याच गटाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे जे काही दिवसांपूर्वी याच भागात झालेल्या चकमकीतून पळून गेले होते.

जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने या महिन्याच्या सुरुवातीला दोन कारवायांमध्ये खोऱ्यात सहा दहशतवाद्यांना ठार केले होते. ज्यामध्ये तीन जण जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. दरम्यान आता गेल्या काही दिवसात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या ८ वर पोहचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर काही आठवड्यातच ही कारवाई केली जात आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अखेर १० मे रोजी भारत पाकिस्तान यांच्या शस्त्रविरांमावर एकमत झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला आहे.