काही दिवसांपूर्वी समाजवाजी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोहम्मद अली जिना यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. त्यांच्या विधानावर आता जदयुचे आमदार खालिद अन्वर यांनी जिनांविषयी केलेल्या एका विधानावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. अखिलेश यादव यांनी जिनांची तुलना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली होती. त्यानंतर आता अन्वर यांनी जिनांना महान स्वातंत्र्य सेनानी म्हटल्यानंतर त्यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. अखिलेश यादव यांनी मोहम्मद अली जिना यांच्याविषयी एका सभेत बोलताना, "सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना एकात संस्थेत शिकून वकील झाले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि कोणत्याही संघर्षापासून ते मागे हटले नाहीत", असं अखिलेश यादव म्हणाले होते. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात जिनांबद्दल वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. "जर जिनांना भारताच पहिले पंतप्रधान बनवलं असतं, तर देशाची फाळणी झालीच नसती", असं राजभर म्हणाले होते. त्यावरून हा वाद वाढल्यानंतर आता अन्वर यांच्या विधानामुळे त्यात तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे. काय म्हणाले अन्वर? जिनांविषयी अन्वर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे. "मोहम्मद अली जिना हे अखंड भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना पाकिस्तानबद्दल अतीव आदर होता. ते एक मोठे नेते होते यामध्ये अजिबात शंका नाही. देशाच्या फाळणीला ते जबाबदार होतेच, पण त्यांच्याइतकेच भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसदेखील फाळणीला जबाबदार होते", असं खालिद अन्वर म्हणाले आहेत. "काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या धोरणामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेस करत असलेल्या राजकारणाचा हा चेहरा आहे. आणि त्याच प्रकारचं राजकारण काँग्रेस खेळत आली आहे", असं देखील अन्वर म्हणाले. पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कधीही…!” काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या सनराईज ओव्हर अयोध्या या पुस्तकातील संदर्भावरून वाद निर्माण झाला होता. सलमान खुर्शिद यांनी पुस्तकामध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या संघटनांशी केल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.