Bilawal Bhutto Remark on Indian Muslims in UN : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी अलिकडेच भारताविरोधात गरळ ओकली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून भारताविरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केलं.

यावेळी एका परदेशी मुस्लिम पत्रकराने भुट्टो यांना त्यांच्याच जुन्या वक्तव्यावरून तोंडघशी पाडलं. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात मुस्लिमांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. त्यांना दहशतवादी मानलं जात आहे”, या भुट्टो यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यानंतर ते पत्रकार भुट्टो यांना म्हणाले, “भारतात ऑपरेशन सिंदूरचं ब्रीफिंग (माहिती देणे) एका मुस्लीम महिला अधिकाऱ्याने केलं होतं”. त्यावर भुट्टो काहीच बोलले नाहीत. त्यांनी केवळ मान डोलावली.

भुट्टो नेमकं काय म्हणाले होते?

भुट्टो म्हणाले होते की, “पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतात मुस्लिमांचं दहशतवादी म्हणून चित्रण केलं जात आहे. भारत इस्रायलच्या पावलावर पाऊल ठेवतोय. तर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंसारखे बनण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत शांततेच्या मार्गाने चालत नाही”.

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांची संयुक्त पत्रकार परिषद

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या मोहिमेच्या यशाची माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेतली होती. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरैशी व विंग कमांडर व्योमिका सिंह या दोघी प्रसारमाध्यमांना समोऱ्या गेल्या. यावेळी भारताचे परराष्ट्र सचिव देखील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या कुरापती अन् भारताचं सडेतोड उत्तर

भारताने आतापर्यंत अनेकदा दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचा भारताविरोधात उपयोग केला आहे. यावेळी देखील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण या पर्यटनस्थळी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते. त्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानी एअरबेसही यामध्ये नुकसानग्रस्त झाले आहेत. पाकिस्तानने ही बाब मान्य केली आहे.