बंगळुरूतील मुन्नेकोलाला येथे सोमवारी एका ३४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक निदान झालं असून त्याने २४ पानी आत्महत्येची चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अतुल सुहास याने २४ पानी आत्महत्येची नोट व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती. सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन असं या ग्रुपचं नाव आहे. यामध्ये त्याने वैवाहिक समस्यांविषयी लिहिलं होतं. यासंदर्भात तो एका संस्थेकडून मदतही घेत होता. पोलिसांनी सांगितलं की, तो मुळचा उत्तर प्रदेशचा असून तो मराठाहाल्ली येथे एका टेक कंपनीत कामाला आहे. त्याने त्याच्या गळ्याभोवती एक बोर्डही लिहिला होता. त्यावर न्याय प्रलंबित आहे असं लिहिलं होतं.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, त्याची पत्नी दिल्लीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असून तिने आतापर्यंत पती आणि त्याच्या पालकांविरोधात नऊवेळा तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी छळ, हत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधासंदर्भात या तक्रारी होत्या.

आत्महत्येसाठी बनवलं टाईमटेबल

या आत्महत्येवरून असं वाटतंय की त्याने त्याची आत्महत्या नियोजित केली होती. त्यानुसार त्याने टाईमटेबल बनवलं होतं. हे टाईमटेबल त्याच्या कपाटावर चिटकलं होतं. आत्महत्येपूर्वी पहिल्या- दुसऱ्या दिवशी काय करायचं हे त्याने ठरवून ठेवलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. एकीकडे पत्नीने केलेल्या तक्रारी तर दुसरीकडे आत्महत्येच्या चिठ्ठीमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले आहे.

हेही वाचा >> सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल

कपाटावर लिहून ठेवलं होतं नियोजन

सुहासने त्याच्या नियोजनात त्याच्या खोलीची चावी कुठे ठेवली आहे इथपासून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचा उल्लेख करत अनेक लोकांची नावेही लिहून ठेवली होती. त्याला कोणाबरोबर व्यवहार करायचा आहे, त्याचा लॅपटॉप आणि आयडीकार्ड ऑफिसला परत द्यायचा आहे, मोबाईलमधील पासवर्ड काढायचे आदीचंही नियोजन त्याने कपाटावर लिहून ठेवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठाहाल्ली पोलिसांनी याप्रकरणी सुहासच्या पत्नी आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम १०८ भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.