नवी दिल्ली : १९८४च्या शीखविरोधी दंगली आणि २००२ सालच्या गोध्रा दंगलींची चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गिरीश ठाकोरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हृदयक्रिया बंद पडल्याने शनिवारी दुपारी गुजरातमध्ये त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
१९३५ साली जन्म झालेले नानावटी यांनी १९५८ साली मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९७९ साली त्यांची सर्वप्रथम गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ओडिशा व कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. १९९५ ते २००० या कालावधीत ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते.
२००२ साली गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या दंगलींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्या. नानावटी आयोग नेमला होता. न्या. नानावटी न्या. अक्षय मेहता यांनी या दंगलींबाबतचा अंतिम अहवाल २०१४ साली गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन मेहता यांना सोपवला होता.
१९८४ सालच्या शीखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने न्या. नानावटी यांची नेमणूक केली. ते या आयोगाचे एकमेव सदस्य होते.