Karnataka home minister G Parameshwara On Bengaluru Stampede : आयपीएल २०२५ हंगामाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ज संघाला नमवत विजेतेपद मिळवलं, यानंतर कर्नाटकात जल्लोष साजरा करण्यात आळा. यादरम्यान खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी (५ जून) प्रचंड चाहते गोळा झाले. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातून याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) ने शहरात विजयोत्सवाचे आयोजन केले होते आणि राज्य सरकारने तशी विनंती केली नव्हती, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी गुरुवारी सांगितले. आरसीबीने संघातील खेळाडूंना विजय उत्सवासाठी बेंगळुरू येथे आणले होते आणि तेव्हाच सरकारला या सत्कार केला पाहिजे असे वाटल्याचे मंत्री म्हणाले.

मंत्री नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेची मॅजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या जेणेकरून जर चूक झाली असेल आणि त्यासाठी जो कोणी दोषी असेल त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल,” असेही राज्याचे गृहमंत्री म्हणाले आहेत.

“आम्ही आरसीबी किंवा कर्नाटक स्टेट क्रिकेट असोशियशन (KSCA)कडे विनंती केली नव्हती, त्यांनी हे (विजयाचा उत्सव) आयोजित केले,” असेही ते म्हणाले.

“त्यांनीच संघाला बंगळुरू येथे आणले. हा बंगळुरूचा संघ असल्याने, सरकारला देखील वाटले की आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे . आम्ही, एक सरकार म्हणून फक्त या कार्यक्रमात सहभागी झालो आणि ही घटना घडली याबद्दल मला खूप वाईट वाटतं,” असे परवमेश्वरा म्हणाले.

मृतदेह पाहून मला खूप वाईट वाटलं, त्यापैकी बहुतेक जण तरुण होते. कोणीही असा विचार केला नव्हता, आम्ही कठोर कारवाई करू आणि कुठे दुर्लक्ष झाले हे शोधून काढू, असेही परमेश्वरा म्हणाले.

या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलीस सुत्रांनी सांगितले की विजयी मिरवणुकीबद्दल संभ्रम आणि मोफत पासेस, मोठ्या प्रमाणात गर्दी आणि स्टेडियममध्ये असलेली मर्यादीत आसन व्यवस्था यामुळे चेंगराचेंगरी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेडियममधील तिकीट घेतलेले लोक आणि ज्यांच्याकडे तिकीट नव्हते असे चाहते हे एकाच जागी जमले, तिकीट नसणाऱ्यांनी देखील स्टेडिएममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने सुरुवातीला गोंधळ झाला आणि नंतर त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.