Mahakumbh Stampede: मौनी अमावस्येनिमित्त पवित्र शाही स्नान करण्यासाठी संगम घाटावर गर्दी उसळल्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास गोंधळ उडाल्यामुळे सदर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ मेळ्यामधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत १० भाविकांचा या घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी तीन वेळा फोनवर चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करत कुंभमेळ्यातील परिस्थितीची माहिती घेतली.

मध्यरात्री संगम घाटावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाकुंभमधील आखाड्यांनी आजचे शाही स्नान रद्द केले असून सर्व १३ आखाड्यांनी आपापल्या कँपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मौनी अमावस्येला गर्दी होईल, ही शक्यता असल्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी चौक्या उभारल्या होत्या, तसेच बॅरिकेड उभे केले होते. मात्र गर्दी आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर हे बॅरिकेडही तुटले. माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, आज १२ कोटी भाविक कुंभमेळ्यात आल्याचा अंदाज आहे. अपेक्षेपेक्षाही अधिक गर्दी झाल्यामुळे ही अप्रिय घटना घडली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनांच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले की, सर्वच घाटावर खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे आज आम्ही फक्त देवांना स्नान घालणार आहोत. गर्दी वाढल्यामुळे संत-महात्मा यांनी घाटावर जाऊ नये, असे आम्ही आवाहन केले आहे. आगामी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आम्ही स्नानासाठी जाऊ. त्यावेळी आम्ही भव्य रुपात घाटाजवळ जाऊन स्नान करू. आज गर्दीमुळे आम्ही माघार घेत आहोत. आज आमच्या देवाचे स्नान झाले म्हणजे आमच्या सर्वांचे स्नान झाले, असे आम्ही समजतो.