पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १९८० च्या दशकातच ‘सबका साथ, सबका विकास’ ही कल्पना सुचली होती, असा खुलासा पीएम मोदींच्या आयुष्याचा आणि सुरुवातीच्या काळाचा मागोवा घेणाऱ्या ‘मोदी आर्काइव्ह’कडून करण्यात आला आहे. ‘मोदी आर्काइव्ह’ने पीएम मोदींची एक हस्तलिखीत नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ या कल्पनेबद्दल फार पूर्वी लिहिलं होतं.

पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर महात्मा गांधींच्या आदर्श विचारांचा किती प्रभाव होता, हे मोदींनी १९८० च्या दशकात लिहिलेल्या नोट्सवरून स्पष्ट होत आहे. रविवारी देशभरात अनेक ठिकाणी महात्मा गांधींची जयंती साजरी करण्यात आली. ही गांधींची १५३ वी जयंती होती. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर ‘मोदी आर्काइव्ह’ने एक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये मोदींनी तरुणवयात असताना महात्मा गांधींचे विचार लिहिल्याचं दिसत आहे.

नरेंद्र मोदींनी १९८० च्या दशकात महात्मा गांधींच्या विचारांचं लिहिलेलं खास टिपण:

संबंधित नोट्समध्ये मोदींनी लिहिलं की, “सर्वात मोठ्या संख्येचं सर्वाधिक भलं करणं, या सिद्धांतावर माझा विश्वास नाही. ५१ टक्के लोकांचं भलं करण्यासाठी ४९ टक्के लोकांचा चांगुलपणा त्याग करावा लागतो. हा एक क्रूर सिद्धांत आहे. यातून मानवतेचं खूप नुकसान झालं आहे. सर्वांचं भले करणं हाच मानवतेचा एकमेव खरा सिद्धांत आहे.” नरेंद्र मोदी यांनी तरुण वयात महात्मा गांधींचं तत्व आपल्या वहीत लिहून ठेवलं होतं. यातूनच ‘सबका साथ, सबका विकास’ची प्रेरणा मिळाली असावी, असं अ’मोदी अर्काइव्ह’ने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.