नवी दिल्ली : भाजपच्या दुसऱ्या बहुप्रतीक्षित उमेदवारी यादीमध्ये बुधवारी महाराष्ट्रासह १० राज्यांतील ७२ नावे जाहीर करण्यात आली. राज्यातील २० जागांवरी उमेदवार जाहीर झाले असले तरी पक्षांतर्गत वादाच्या तसेच महायुतीत तिढा असलेल्या जागांचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीनगर, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उत्तर-मध्य मुंबई आदी कळीच्या जागांचा दुसऱ्या यादीतही समावेश नाही. तर ७ नवे चेहरे मैदानात उतरवून मोदी-शहांनी उमेदवार बदलाचे धक्कातंत्र कायम ठेवले आहे.  

अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पारंपरिक नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश नसल्यामुळे सुरू झालेल्या राजकीय चर्चाना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अन्य केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांना पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असून ते उत्तर-मुंबई मतदारसंघातून लढतील. तेथून गोपाळ शेट्टी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार असून त्यांना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या जागी बीड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही केंद्राच्या राजकारणात आणले जात असून त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथील २०१९मधील पक्षाचे उमेदवार हंसराज अहीर आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. बहुचर्चित पुणे मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ या जनसंपर्क असलेल्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत उतरण्याची संधी देण्यात आली आहे. इथे भाजपचे नेते सुनील देवधर इच्छुक होते. जळगावमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जाणारे उन्मेश पाटील यांना धक्का देण्यात आला आहे. त्यांच्या जागी प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे. २०१९ मध्येही वाघ यांच्या नावाची होती. त्यांना प्रतीक्षेचे फळ मिळाले आहे.

हेही वाचा >>> “त्याचं वय पाहता…”, पुण्यातून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर होताच दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट, म्हणाले…

अकोल्यामध्ये खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे हे नवा चेहरा असतील. प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रे यवेळी निवढणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. वडिलांच्या पक्षनिष्ठेचे अनुप यांना फळ मिळाल्याचे मानले जात आहे. मुंबईतील सहा जागांपैकी दोन जागांवर भाजपने उमेदवारांची घोषणा केली असून त्यामध्ये मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातून मनोज कोटक यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीमंत्री भारती पवार यांना िदडोरी, कपिल पाटील यांना भिवंडी, रावसाहेब दानवे यांना जालना यांना त्यांच्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन मोदींनी या तीनही मंत्र्यांवर विश्वास दाखवला आहे. या शिवाय हीना गावीत (नंदुरबार), सुभाष भामरे (धुळे), रामदास तडस (वर्धा), प्रतापराव पाटील-चिखलीकर (नांदेड), रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (माढा), सुधाकर श्रृंगारे (लातूर) आणि संजयकाका पाटील (सांगली) यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास ठेवला आहे.

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील, रावेरमधून रक्षा खडसे यांना आश्चर्यकारकरित्या पुन्हा संधी देण्यात आली आहे. विखे-पाटील यांच्याऐवजी फडणवीस यांच्या विश्वासातील नेत्याच्या नावाची चर्चा होती. तर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना संधी नाकारली जाईल, असे मानले जात होते. मात्र  त्यांना पुन्हा उमेदवारी देऊन पक्षाने अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांच्याबाबतही सहानुभूतीने विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. 

चार खासदारांना धक्का

मुंबईतील गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना पक्षाने धक्का दिला असून त्यांच्या मतदारसंघांत अनुक्रमे पियुष गोयल आणि मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापले गेले आहे. जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना संधी मिळाली.

महायुतीतील वादामुळे अडचण

महायुतीमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यामध्ये आले असले तरी अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. ४८ पैकी भाजप ३१, शिवसेना (शिंदे गट) १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ जागांवर लढणार असल्याचे मानले जात आहे. मात्र अमित शहा यांच्याशी दोन वेळा चर्चा होऊनही तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजपने २० जागांवरच उमेदवार जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाबेन डेलकर भाजपच्या तिकिटावर

दादरा, नगर हवेली-दमणच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.  या मतदारसंघातून सातवेळा खासदार झालेले मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कलाबेन यांना २०२३ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होत्या. मात्र त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर करून भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.