निवृत्त न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू आपल्या वादग्रस्त टविट्मुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी आणखी एक नवे टविट् करून चर्चेला तोंड फोडले आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला (बसप) सर्वाधिक जागा मिळतील व ते सत्तेवर येतील असे भाकीत केले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीवर त्यांनी एक विस्तृत ब्लॉग लिहिला असून त्यात त्यांनी जातीनिहाय्य विश्लेषण केले आहे.
काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. काटजू आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, उत्तरप्रदेश आणि बिहारचे राजकारण हे जातीवर आधारित आहे. याला फक्त एखादी लाट अपवाद ठरू शकते. मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी मोदी लाट आली होती त्याचा फायदा भाजपला झाला.
मायावती यांच्याकडे तब्बल २० टक्के ‘एससी’ मते आहेत. त्यांच्या या मतपेटीला कोणीही हात लावू शकत नाही. समाजवादी पक्षाकडे हीच १७ टक्के मते आहेत. यादव (सुमारे ९ टक्के लोकसंख्या) ही मते समाजवादी पक्षाकडे असतील. पण ओबीसीमधील दुसऱ्या क्रमांकाचा असलेला कुर्मी समाज (सुमारे ९ टक्के) हे यादवांचे पारंपारिक विरोधक आहेत. २० टक्के एससी+ १८ टक्के मुस्लिम मते असे एकूण ३८ टक्के मते बसपकडे असल्याचे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखात म्हटले आहे.
भाजपला उच्चवर्णीय हिंदू समाजाची मते मिळतात. ब्राह्मण, राजपूत, बनिया आदींची संख्या १८ टक्के इतकी होते. कोणताही पक्ष १८ टक्के मते घेऊन विजयी होऊ शकत नाही. विजयी होण्यासाठी किमान ३० टक्के मतांची गरज आहे. भाजपसाठी हीच धोक्याची घंटी आहे. १८ टक्के मतांवर ते सत्ता कशी मिळवू शकतात असा सवाल काटजू यांनी उपस्थित केला आहे. मतदारांमध्ये धार्मिक भावना जागृत करणे किंवा धर्माच्या नावावर दंगल होणे हे भाजपसाठी पथ्यावर पडू शकते. भाजपकडे राममंदिरचा मुद्दा आहे. पण तोही आता चालण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानविरोधातील कारवाईचा मुद्दा पुढे आणला जाऊ शकतो. परंतु तो जास्त काळ टिकणार नाही अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये १८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मागीलवेळी त्यांनी समाजवादी पक्षाला साथ दिली होती. त्यामुळे अखिलेश यादव सत्तेवर आरूढ झाले होते. पण यंदा त्यांना वातावरण अनुकूल नसल्याचे काटजू यांनी म्हटले आहे. दादरी, मुझ्झफरनगर, वल्लभनगर येथील घटनांमुळे मुस्लिम समाज समाजवादी पक्षावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचारावर सरकारला नियंत्रण मिळवता आलेले नही. त्यामुळे मुस्लिम समाजाचा भ्रमनिरास झाला असल्याचे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
यंदा मुस्लिम मतांमध्ये विभागणी होणार नसल्याचे सांगत घरवापसी, गो रक्षक, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची, साक्षी महाराज यांच्या वादग्रस्त विधानांमुळे मुस्लिम समाजात नाराजी आहे. त्यामुळे यंदा मुस्लिमांची एकगठ्ठा मते एकाच पक्षाला मिळतील असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला राज्यात आता स्वत:ची व्होट बँकच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते आता मायावतींवर अवलंबून असतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markandey katju predicting mayawati will be win up assembly election
First published on: 10-10-2016 at 18:27 IST