पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. बेरोजगारी, हिंदू-मुस्लीम दंगलीसह आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू येथे बोलताना मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका केल्याचं दिसून आलं. मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, तरूणांची सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. ''त्यांच्याकडे(सरकारकडे) यावर काहीच उपाय नाही. मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र त्यांच्याकडे यावर काहीच उत्तर नाही. त्यांचा एकच कारखाना काम करतो - हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं'' तसेच, त्रिपुरा येथील हिंसाचारानंतर अनेक ठिकाणी घडलेल्या दंगलीच्या घटनांवरून बोलताना मेहबुबा मुफ्तींनी म्हटले की, ''त्यांनी त्रिपुरा, नंतर उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात सुरूवात केली. कारण, जसजशी उत्तरप्रदेशची निवडणूक जवळ येत आहे, त्यांच्याकडे दुसरं काही दाखवण्यासाठी नाही. ते केवळ याच आधारावर मत मागतात.'' या अगोदर पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्याने दावा केला होता की, पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडलेल्या एका तरुणाच्या परिवाराला भेटायला जाऊ नये यासाठी त्यांना कैद केलं असल्याचा दावा त्यांनी केला होता. या नेत्याच्या मते, पोलिसांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आलं होतं.