रोजगाराच्या मुद्द्यावर अनेकदा प्रश्नांना सामोरे जाणारे मोदी सरकार आता या संकटावर मात करण्यासाठी योजना तयार करत आहे. येत्या दीड वर्षात सुमारे १० लाख पद भरती करण्यात यावी, असे निर्देश खुद्द पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. या लोकांना सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये काम मिळणार आहे. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये १० लाख पदांची भरती करण्यात येणार आहे.

पीएमओ ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून १० लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांत पाटणा, अलाहाबाद सारख्या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने केली आहेत. मोदी सरकारवर हल्लाबोल करत अनेकदा ते रोजगार देऊ शकले नसल्याचा आरोप केला आहे. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर करोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

काँग्रेसची जोरदार टीका

नोकऱ्यांसंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत भाष्ये केले आहे. “याला ९०० चूहे खाकर बिली हज को चली म्हटले जाते. आपण ५० वर्षातील सर्वात वाईट रोजगार (दर) अनुभवत आहोत. रुपयाचे मूल्य ७५ वर्षातील सर्वात कमी आहे. ‘ट्विटर ट्विटर’ खेळून पंतप्रधान किती काळ आमचे लक्ष विचलित करणार,” असे सुरजेवाला म्हणाले.

दरम्यान, गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे  सध्या हा आकडा १० लाखांच्या जवळ गेला असेल, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरतीचे आदेश दिले आहेत. जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत. अशा प्रकारे ८.७२ लाख पदांची भरती करण्याची गरज आहे. तर २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीतील भरतीची आकडेवारी देताना जितेंद्र सिंह यांनी एसएससीमध्ये एकूण २,१४,६०१ कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे सांगितले होते. याशिवाय आरआरबीने २,०४,९४५ लोकांना नियुक्ती दिली आहे. तर युपीएसीने देखील २५,२६७ उमेदवारांची निवड केली आहे.