पती-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केले जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. पुराणांनुसार चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हा उपवास सोडावयाचा असतो. आजच्या करवा चौथची पूजा करण्यासाठी ५ वाजून ४३ मिनिटांचा शुभ मुहूर्त आहे. सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत ही पूजा करता येऊ शकतो. तर ८ वाजून ५० मिनिटांनी चंद्राला अर्घ्य देता येऊ शकते. साजश्रृंगार करुन मोठ्या भावभक्तिने हा उपवास केला जातो.

करवा चौथच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्यासोबतच महिलांनी शंकर-पार्वती, कार्तिकेय आणि गणपतीची आराधना करावी. या उपवासामध्ये तांदूळ, उडदाची डाळ, श्रृंगाराची सामग्री हे सर्व एका साहित्य एकत्र ठेवून पतीच्या आईला दिले जाते.
‘मम सुखसौभाग्य पुत्रपौत्रादि सुस्थिर श्री प्राप्तये करक चतुर्थी व्रतमहं करिष्ये’ या मंत्राचा उच्चार करत विवाहित स्त्रियांनी त्यांच्या उपवासाची सुरुवात करावी.

संपूर्ण दिवस निर्जळी उपवास केल्यानंतर पूजेनंतर या उपवासाचे महात्म्य सांगणारी कथा ऐकल्यानंतर आणि चंद्रदर्शन झाल्यानंतरच पाणी पिऊन हा उपवास सोडावा. पती-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ बनवणाऱ्या या उपवासामध्ये लाल रंगाला फार महत्त्व असते. त्यामुळेच या दिवशी लाल रंगांचे वस्त्र परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारे विविध चालिरिती आणि प्रथांच्या आधारे आज देशभरत करवा चौथचा उत्साह पाहायला मिळत आहे.

करवा चौथसाठी महत्त्वपूर्ण असे चंद्रोदय मुहूर्त खालीलप्रमाणे-
उत्तर प्रदेश- ८ वाजून ३५ मिनिटे
मुंबई- ९ वाजून २१ मिनिटे
राजस्थान- ८ वाजून ५६ मिनिटे
हिमाचल प्रदेश- ८ वाजून ४३ मिनिटे
पंजाब- ८ वाजून ४९ मिनिटे
हरियाणा- ८ वाजून ४८ मिनिटे
बंगळूरु-९ वाजून ९ मिनिटे
कलकत्ता- ८ वाजून ११ मिनिटे