भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र ६०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकणार आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे. ब्राह्रमोसच्या नव्या आवृत्तीमुळे भारतीय सैन्याच्या लष्करी क्षमतेत अनेक पटीने वाढ होणार आहे.
जून महिन्यात भारताला अधिकृतपणे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाचे (मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम) पूर्णवेळ सदस्यत्व मिळाले होते. क्षेपणास्त्रांचा कमीत कमी वापर करण्यात यावा, यासाठी हा गट कार्यरत आहे. रासायनिक, जैविक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची निर्मिती आणि त्याचा वापरावरील प्रतिबंधासाठी एमटीसीआर काम करते. MTCR गटाच्या नियमांनुसार यामधील सदस्य देश गटाबाहेरील देशांना ३०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये भागीदारी करू शकत नाहीत, किंवा विकू शकत नाहीत. मात्र, आता भारताला एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाल्याने रशियाच्या साथीने क्षेपणास्त्र विकसित करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या भारताकडे असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राद्वारे ३०० किलोमीटरपर्यंत मारा येऊ शकतो. लक्ष्याच्या भोवती कितीही सुरक्षा असेल तरी त्यावर नेमका निशाणा साधणे ही ब्राह्मोसचे वैशिष्ट्य आहे.