भारतात आज संगीताकडे वळणाऱ्या मुलांची संख्या वाढते आहे. त्यातही तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत उत्तम पद्धतीने रुजते आहे, असे समाधानाचे उद्गार विख्यात सरोदवादक उ. अमजद अली खान यांनी येथे काढले. संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या ‘म्युझिक फॉर पीस’ या मैफलीसाठी अमान अली खान आणि अयान अली खान या आपल्या दोन्ही मुलांसह ते येथे आले होते.
‘आपली कला सादर करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपलब्ध होणारी व्यासपीठे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांचा लाभ या पिढीला होत आहे. सरोद या वाद्याची आर्तता आणि त्याच्या ध्वनीचा श्रोत्यांपर्यंत पोहोचणारा दर्जा यामुळे हे वाद्य अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. कदाचित अधिकाधिक तरुणांना या वाद्याकडे वळविण्यात माझेही कळत-नकळत योगदान झाले असेल,’’ असे अमजद अली खान यांनी नमूद केले.
‘आता परदेशातही भारतीय संगीताला जो उदंड प्रतिसाद मिळतो आहे, तो अत्यंत हृद्य आणि उत्साहवर्धक आहे. मानवी जीवनातील वाढता ताण आणि भारतीय शास्त्रीय संगीतामधून त्यापासून मिळणारी मुक्ती, हे यामागील एक कारण असू शकते,’’ असे हिंदुस्तानी संगीताच्या प्रसाराचे एक कारणही त्यांनी विशद केले.
‘आई ही पहिली गुरु’
जगभरातील स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन अतिशय व्यथित करणारा आहे. माणसाला आज सुसंस्कृत करण्याची अधिक गरज आहे. आई ही प्रत्येक बाळाची पहिली गुरू असते आणि तिने आपल्या मुलावर सौहार्दता आणि अहिंसेचे संस्कार करण्याची गरज आहे, पण त्यासाठी आधी मुळात समाजाचा स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन स्वच्छ आणि सन्मानाचा होणे आवश्यक असल्याचे मत सरोदवादक उ. अमजद अली खान यांनी व्यक्त केले.
सध्या भारतात सतारवादक, तबलावादक, गायक आणि नर्तक म्हणून युवकांची संख्या वाढते आहे. आम्ही तरुण असताना इतक्या मोठय़ा संख्येने अशी अस्सल गुणवत्ता पाहाण्यास मिळत नव्हती. अमान आणि अयानच्या पिढीत आणि समकालीन युवा कलाकारांमधील गुणवत्ता स्तिमित करणारी आणि तितकाच आनंद देणारी आहे.
उस्ताद अमजद अली खान