गेली पाच वर्षे सत्तेच्या गादीवर हे आणि शेतीसाठी काय केलं याची आम्ही उत्तर द्यायची. अहो मोदी आम्ही विरोधी पक्षात आहोत याची आठवण ठेवा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर केली. सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे शरद पवार बोलत होते.

भाजपाला सत्तेची इतकी मस्ती आली आहे की, त्यांचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे ‌शेतकर्‍यांना साले म्हणत आहेत तर दुसरीकडे प्रवक्ते अवधूत वाघ हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस बोलत आहेत आणि हेच त्यांच्याकडे मते मागायला जात आहेत, यांना मते मागायला लाज कशी वाटत नाही असा सवालही शरद पवार यांनी विचारला. त्यांच्याकडे पैसा आहे जाहिरातींवर खर्च करण्यासाठी आमच्याकडे नाही त्यामुळे त्यांच्या तोंडातून माझी फुकट प्रसिध्दी होत आहे हे चांगलेच आहे असं ते म्हणाले.

“महाराष्ट्रातल्या या सभांमध्ये मोदी कधी सांगतात पवारांच्या घरात भांडणे सुरु आहेत तर कधी पवारांचे पुतण्याने अधिकार काढून घेतले. अहो, मोदी आमची चिंता कशाला करताय. हा एकटयादुकटयाचा राष्ट्रवादी पक्ष नाही हा जनतेच्या आशिर्वादाने उभा राहिलेला पक्ष आहे,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

सांगली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं नातं अतूट आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. हा वणवा आता पेटल्याशिवाय राहणार नाही असं पवार म्हणाले.